पायाची शस्त्रक्रिया केली अन् अभिनेत्याचा हाकनाक जीव गेला, 12 वर्षांनी 5 डॉक्टर गोत्यात, नेमकं प्रकरण काय?
न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये जुनिअर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या अभिनेता सलमान बाबर शाहच्या मृत्यूप्रकरणी 12 वर्षांनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर परिसरातील दोन रुग्णालयांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर अनेक वर्षांनी कुटुंबीयांनी न्यायासाठी लढा दिल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमानच्या आई नसीम शाह यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. एप्रिल 2014 मध्ये शूटिंगवरून परतताना सलमानला टेम्पोची धडक बसली होती. त्यानंतर त्याला वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.
या प्रकरणात शिवाजीनगर येथील मिलेनियम रुग्णालयातील डॉ. नियाझ अहमद खान, डॉ. इम्तियाज अहमद खान आणि डॉ. उमेश पिंपळे यांच्यासह चेंबूर येथील साई ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील डॉ. खालिद आणि डॉ. अमित शोभावत यांचा समावेश आहे.
एफआयआरनुसार, अपघातानंतर सलमानवर उपचार करण्यात आले; मात्र उपचारात झालेल्या त्रुटी, उशीर आणि शस्त्रक्रियेनंतर योग्य वैद्यकीय देखरेख न मिळाल्याने त्यांची प्रकृती बिघडत गेली. तसेच, या प्रकरणात महत्त्वाच्या वैद्यकीय नोंदी नष्ट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
ऑपरेशन करताना वीजपुरवठा खंडित
दरम्यान, ऑपरेशन करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत त्यावेळी त्यांनी इतक्या दूर दाखल करण्यापेक्षा जवळच्या रुग्णालयात दाखल करा, असा सल्ला देत मिलेनियम रुग्णालयाचे नाव सुचवले. त्यानुसार सलमान याच्या कुटुंबीयांनी त्याला या रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनीदेखील शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार सलमान याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू असतानाच रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. प्रकृती बिघडत गेली शस्त्रक्रिया झाल्यानंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे रक्त चढवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या वेळी वैद्यकीय नोंदींमध्ये मृत्यू नैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच शवविच्छेदनही करण्यात आले नव्हते. मात्र, कालांतराने कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






















