सुशांत सिंह राजपूतच्या वादळानंतर अभिनेत्रीचं काम थांबलं, 6 वर्षांनी अभिनयात पुनरागमन; म्हणाली ' Exit स्वेच्छेने नव्हती '
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादळामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे रियाच्या आयुष्यात मोठा काळ अस्थिरतेत गेला होता.

Sushant Singh Rajput Riya Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी वेबसीरिज ‘फॅमिली बिझनेस’मधून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादळामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे रियाच्या आयुष्यात मोठा काळ अस्थिरतेत गेला होता. जून 2020 नंतर तिला प्रचंड मानसिक तणाव आणि सार्वजनिक टीकेला सामोरं जावं लागलं.
अभिनयाच्या संधीच मिळत नव्हत्या....
या संपूर्ण कालखंडाकडे मागे वळून पाहताना रियाने अभिनयातून दूर जाण्याचा निर्णय किती वेदनादायक होता, याबद्दल खुलासा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, जवळपास दहा वर्षं अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडल्यानंतर अभिनय सोडावा लागणं तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. अभिनयाचं स्वप्न बाजूला ठेवण्यासाठी तिला अनेक थेरपी सेशन्स घ्यावे लागले. “मला अभिनयाच्या संधीच मिळत नव्हत्या, त्यामुळे त्याबद्दल विचार करणंही थांबवावं लागलं,” असं ती म्हणाली.
रिया पुढे सांगते की, सुरुवातीला तिने अनेक प्रोजेक्ट्स नाकारले आणि स्वतःला अभिनयापासून पूर्णपणे दूर ठेवलं. मात्र तिच्या कमबॅकमागे हंसल मेहता यांचा मोठा वाटा असल्याचं तिने मान्य केलं. “हंसल सर आणि लेखकांनी मला विचारलं की मला अभिनयापासून रोखणारं नेमकं काय आहे. मी त्यांना सांगितलं की मी अभिनय सोडला आहे. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की, त्यामुळेच तुला हे काम करायला हवं. तू चांगलं करशील की नाही, याला अर्थ नाही,” असं रियाने सांगितलं.
अभिनयातून Exit स्वेच्छेने नव्हती..
या निर्णयाकडे मागे वळून पाहताना रिया म्हणते की, आता मला हा निर्णय योग्य वाटतो. “सेटवर परत जाणं वेगळंच होतं. गेल्या सात वर्षांत खूप काही अनुभवलं आहे,” असं तिने नमूद केलं. दरम्यान, अभिनयापासून दूर राहण्याचा काळ हा आपला स्वेच्छेचा निर्णय नव्हता, हेही रियाने स्पष्ट केलं. “त्या काळात कुणालाच माझ्यासोबत काम करायचं नव्हतं, तो काळ अत्यंत वेदनादायक होता,” असं ती म्हणाली. या कठीण काळात मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण सावरू शकलो, असंही तिने सांगितलं. “माझे मित्र आणि कुटुंब नसते, तर कदाचित मी या सगळ्यातून बाहेर येऊ शकले नसते,” अशी भावना तिने व्यक्त केली.
























