Lalita Pawar : कधी खाष्ट सासू तर कधी कठोर आई, अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar) जेव्हा पडद्यावर यायच्या, तेव्हा अनेकांच्या तोंडून शिव्याशाप आल्याशिवाय राहायचे नाहीत. त्यांचा अभिनय पाहून विश्वास ठेवणं कठीण व्हायचं की, त्या अभिनय करतात की, सगळं खरंखुरं घडतं आहे. त्यांनी काही सॉफ्ट रोलही केले, पण त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता निगेटिव्ह भूमिकांमुळे मिळाली.

Continues below advertisement

ललिता पवार यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी येवल्याचे रेशमी आणि सुती वस्त्रांचे सधन व्यापारी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला होता. ललिता पवार यांचे खरे नाव ‘अंबू सगुण’ होते. वयाच्या नवव्या वर्षांपासून त्यांनी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करायला सुरुवात केली होती. आर्यन कंपनीच्या नानासाहेब सरपोतदारांनी त्यांना या क्षेत्रात येण्याची संधी दिली होती. नासाहेब सरपोतदार यांच्याच कंपनीत ललिता पवार यांनी 18 रुपये मासिक पगारावर काम करणे सुरु केले.

मूकपटातून करिअरची सुरुवात

Continues below advertisement

‘गनिमी कावा’, ‘आर्य महिला’, ‘ठकसेन’, ‘पारिजातक’, ‘भीमसेन’, ‘पृथ्वीराज संयोगिता’, ‘नको गं बाई लग्न’, ‘पतितोद्धार’, ‘सुभद्रा हरण’, ‘चतुर सुंदरी’ हे त्यांचे मूकपट लोकप्रिय झाले होते. अभिनयासोबतच त्या उत्कृष्ट गायिका देखील होत्या. 1935 साली प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत-ए-मर्दा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बोलपटांच्या विश्वात पदार्पण केलं. या चित्रपटातील सर्व गाणी ललिता यांनी स्वतः गायली होती. चित्रपटातलं ‘नील आभा में प्यारा गुलाब रहे, मेरे दिल में प्यारा गुलाब रहे’  हे गाणं फारच लोकप्रिय झालं होतं. तब्बल चार आठवडे चाललेल्या या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला.

पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. 1938मध्ये टॉलस्टॉयच्या ‘रेसरेक्शन’ या कादंबरीवर आधारित ‘दुनिया क्या है?’ या चित्रपटासाठी निर्माती-अभिनेत्री-गायिका अशी तिहेरी भूमिका त्यांनी निभावली. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे पती गणपतराव पवार यांनी केले होते. भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित ‘नेताजी पालकर’ या चित्रपटात ‘काशी’ या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठविली. हा त्यांचा पहिला मराठी बोलपट होता.

भगवानदादांच्या एका ‘थप्पड’मुळे उध्वस्त झालं करिअर!

1942 मध्ये भगवानदादांबरोबर त्यांनी ‘जंग-ए-आझादी’ या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरुवात केली. चित्रपटात थंडीच्या दिवसात, तळ्यात स्नान करीत असलेल्या ललिताला मास्टर भगवान थोबाडीत देतात असे एक दृश्य होते. भगवानदादा पैलवान होते आणि फिल्मी दुनियेत नवखे होते. त्यांनी चुकून ललिता यांच्या कानफटीत एक सणसणीत ठेवून दिली. त्यामुळे ललिता यांच्या डाव्या डोळयाची रक्तवाहिनी फुटली, चेहऱ्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अॅटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार घेऊनही शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. परिणामी त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांशी बंद झाले.

व्यंगावर मात करत त्यांनी चित्रपटांमध्ये चरित्र आणि खलनायिकी भूमिका साकारण्यास सुरुवात केली. ‘अमृत’, ‘गोरा कुंभार’, ‘जय मल्हार’, ‘रामशास्त्री’, ‘अमर भूपाळी’, ‘मानाचं पान’, ‘चोरीचा मामला’ यांसारखे मराठी चित्रपट तर, 'श्री 420', 'अनाड़ी', 'हम दोनों', 'आनंद', 'नसीब', 'दुसरी सीता', 'काली घटा' या हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. ललिता पवार यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत ‘मंथरा’ची भूमिका साकारली होती.

‘या’ पुरस्कारांनी झाला सन्मान!

ललिताबाईंना 1960 मध्ये ‘अनाडी’ चित्रपटातील ‘डिसा’ या भूमिकेकरिता फिल्मफेअरचा साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 1961 साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, 1977 साली ‘महाराष्ट्र राज्य पुरस्करा’ने गौरविण्यात आले. ‘गृहस्थी’, ‘सजनी’, ‘अनाडी’, ‘घर बसा के देखो’ या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले. पडद्यावर कठोर दिसणाऱ्या ललिता पवार खऱ्या आयुष्यात मात्र वेगळ्या होत्या. ललिता यांनी आपल्या कारकीर्दीत जवळपास 700 चित्रपटांमध्ये काम केलं. 1990 मध्ये ललिता पवार यांना जबड्याचा कर्करोग झाला. कर्करोगाच्या उपचारांदरम्यान त्यांना स्मृतीभ्रंश झाला. 24 फेब्रुवारी 1998 पडद्यावरच्या या 'खाष्ट सासू'ने 'आरोही' या आपल्या बंगल्यात अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा :