मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी  देखील उपस्थित होत्या. त्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.


2019 मधील लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाला रामराम केला होता. मात्र आता तीच काँग्रेस शिवसेनेसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत विराजमान आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशासाठी राजकीय विश्लेषक वेगळ्या अनुषंगाने पाहत आहेत.





पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नमन केलं. "फार असं वाटतंय की असायला पाहिजे होते हे, एकच गोष्ट खरोखरच मिस करतेय," अशा भावना उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.





उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळलं ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून. त्यानंतर रंगीला, सत्या, कौन, जंगल, मस्त, जुदाई, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून उर्मिला यांनी चतुरस्र अभिनेत्री अशी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.


कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलं. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली. या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने पलटवार केला. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.


संबंधित बातम्या


'ग्लॅमरस' शिवसेना! शिवसेनेत नाराजी, सेनेतले सैनिक गेले कुठे?


महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी 'या' 12 जणांना संधी, जाणून घ्या त्यांच्याविषयी


Urmila Matondkar to join Shivsena |उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर काँग्रेसची भूमिका काय?