सिनेमा म्हटलं तर बोल्ड आहे. पण म्हटलं तर आता त्यातला बोल्डनेस उरलेला नाही. म्हणजे, अगदी कोरोना लागेपर्यंत हा सिनेमा आला असता तर या सिनेमातला बोल्डनेस भारी वाटला असता. म्हणजे, यात तसे डायलॉग्ज आहेत. अगदीच उदारहण द्यायचं झालं, तर इंदूची मैत्रीण सोनल सॉलिड फॉर्वर्ड असते. इंदूसाठी सोनल ही जरा कमी एकविस अपेक्षित असते. इकडे काही केल्या इंदूचं मुलाशी जमत नसतं. कारण, बाकी बोलायला चालायला इंदू एक नंबर असली तरी ती आपल्या प्रियकराला आपल्यापासून 12 इंचांवर ठेवत असते. इंदूपासून एका फुटाचं 'ते' अंतर पार करता न आल्याने आता अखेर प्रियकर इरेला पेटला आहे. आर या पार अशाच मनस्थितीत तो आहे. इंदूचं म्हणणं असतं की आधी तू माझ्या घरच्यांना लग्नाची मागणी घाल. मग लग्न होऊ दे. मग तू तुला हवं ते कर. इंदू आणि प्रियकरातलं हा झगडा सोनलच्या कानावर गेल्यावर सोनल तिला ज्ञान देते. ती म्हणते, पूर्वी मुली आधी लग्न करायच्या आणि मग लग्न झाल्यावर नवऱ्याला आपलं सर्वस्व अर्पण करायच्या. आता तसं नसतं. लग्नाच्या आधी त्याची नमूना चाचणी घ्यायची असते. त्यानंतर लग्नाचा विषय असतो. वगेरै.. वगैरे..


कोरोनाच्या आधीही असे बोल्ड सिनेमे आले आहेतच. नाही अशातला भाग नाही. विरे दी वेडिंगपासून इतर अनेक सिनेमांचे दाखले देता येतील. पण कोरोनाने वेबसीरीजपर्यंत असलेला बोल्ड्नेस घराघरात पोचवला. त्यामुळे गेल्या आठेक महिन्यांत पब्लिक जाम 'पुढं' गेलं आहे. हुशार झालं आहे. असो. तर सेक्स आणि लग्न अशा दुधारी तलवारीच्या पात्यावर हा सिनेमा उभा करण्यात आला आहे. दिग्दर्शक आणि लेखक अबीर सेनगुप्ता हे आहेत. अबीर सेनगुप्ता यांचा हा चित्रपट. सिनेमाचा प्लॉट गमतीदार आहे. हल्ली वेगवेगळी डेटिंग एप्स आलेली आहेत बाजारात. त्यांचा हात पकडून दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवला आहे. या सिनेमातला एक रहस्यमय किनारही देण्यात आली आहे. असं सगळं असलं तरी या चित्रपटातले संवाद.. त्यातले काही प्रसंग फारच लांबले आहेत. ते इतके लांबलेत की ते खोटे वाटू लागतात. म्हणजे, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या इंदूवर लाईन मारणाऱ्यांची उणीव नसते. पण म्हणून तिच्यावर लाईन मारणारे तीन काका, गल्लीतला किट्टू यांच्यासोबतचे प्रसंग फारच लोचट झालेत. बरं..ते सिनेमाभर येत राहतात. त्यामुळे ही जवानी जरा लांबलेली.. खेचलेली होऊ लागते. सिनेमात समरची एंट्री होणं ही एक त्यातल्या त्यात जमेची बाजू. समर आणि इंदू एकमेकांना भेटणं. त्यानंतर त्यांच्यात घडणारे काही प्रसंग सिनेमाचा वेग वाढवतात. पण पुन्हा एकदा प्रसंग चांगला उठत असला तरी त्यातले संवाद फारच पोरकट वाटू लागतात. समर हा मूळचा पााकिस्तानचा असतो. हे कळल्यावर इंदू आणि समरमध्ये अत्यंत पाणचट संवाद सुरू होतात. तुमच्या देशात हे आहे का.. तुमच्या देशात ते आहे का.. हे असं इंटरनेटच्या युगात एकमेकांना विचारणं म्हणजे भरलेल्या ताटावर जेवायला बसल्यावर तुमच्या घरात मीठ आहे का असं विचारण्यासारखं आहे. त्यातले काही प्रसंगांमधून, संवादांमधून मेसेज देण्याचा प्रयत्न दिला गेला आहे हे कळतं. पण त्यासाठी फारच साधे सोपे संवाद यात दिसतात. सोनल आणि इंदूमधला सायकल रिक्षातला प्रसंगही वेड्यासारखा खेचला गेलाय. किट्टू आणि इंदूमधला घरातला प्रसंग.. जरा ओव्हर वाटतात. शिवाय, डिलिव्हरी बॉयला थेट घरात घेण्याचा प्रसंगही हस्यास्पद झालाय. दुर्दैवाने तिथे लेखकाची गोची झाल्याचं दिसतं. त्या बॉयला आत कसं घ्यायचं याचा तिढा न सुटल्याने त्याला 'तशी' एंट्री दिली गेली आहे असं वाटतं.


तांत्रिक आघाड्यांवर चित्रपट अव्वल आहे. कलादिग्दर्शन, छायांकन, संकलन नेटकं आहे. संगीताबद्दल यात लक्षात राहणारं गाणं मिका सिंगचं रिमिक्स करून वापरलेलं आहे. सावन मे लग गयी आग.. ते गाणं ठेका धरायला लावतं. बाकी गाणी अधेमधे येऊन जातात. त्यातलं दिल तेरा हे गाणं थ्री इडियट्समध्लया झुबी डुबी.. ची आठवण करून देतं. बघायला चांगलं आहे ते गाणं. पण लक्षात फारसं राहात नाही. असो.


पटकथा, संवाद या पातळ्यांवर लांबल्याने ही जवानी पुरती ताणून दमून जाते. एक नक्की, इंदूची भूमिका करणारी कियारा आडवानी, समर साकारणारा आदित्य सील, सोनल बनलेली मल्लिका दुआ यांची कामं चांगली झालीत. कियाराला सोनलने बऱ्याच प्रसंगांमध्ये खाऊन टाकलंय. एकूणात, ही जवानी विनाकारण लांबली आहे. यात जवानी असल्यामुळे सर्वसाधारणपणे उच्चारायला असभ्य, शिवराळ नसणारे असे अनेक शब्द यात आहेत. तर असा सगळा मामला आहे. या प्रकारामुळे पिक्चर-बिक्चर मध्ये या चित्रपटाला मिळतायत दोन स्टार्स. कलाकार चांगले आहेत. पण पटकथा आणि संवाद जरा आणखी कसून बांधले असते तर धमाल आली असती. एनी वे. बेटर लक नेक्स्ट टाईम.


इतर महत्वाच्या बातम्या :
Ranveer Singh's 10 Years in Bollywood : 'बँड बाजा बारात' ते 'गली बॉय'; बॉलिवूडच्या 'बाजीराव'चा 10 वर्षांचा प्रवास


'AK vs AK' च्या ट्रेलरवर भारतीय हवाई दलाचा आक्षेप, काही दृष्ये वगळण्याची सूचना