मुंबई : एकीकडे राज्यसभेचं तापलेलं वातावरण थंड होतं तोपर्यंत महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी (Vidhan Parishad Election) लॅाबिंग सुरु केली आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्यात जागावाटपाचा तिढा आतापासूनच दिसू लागला आहे. अगोदरच नाराजीची सूर असलेली कॉंग्रेस विधानपरिषदेच्या दोन जागांवर नंबर लावून बसलीय तसेच आधीच राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत कागदावर असलेले उमेदवार या निवडणुकीत इच्छुक आहेत.


निवडणुकीच्या या आखाड्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगतोय. पण त्यातही छत्रपती संभाजीराजांच्या एन्ट्रीनं राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. राज्य सभेपाठोपाठ येणा-या विधानपरिषदेची आतापासूनच चर्चा आणि लॅाबिंग सुरु झालीय. एवढंच काय तर कॉंग्रेसनं आधीच दोन जागांवर दावा देखील केला आहे.  त्यामुळे आतापासूनच परिषदेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. 
 
विधानपरिषदेच्या एका सदस्य निवडीसाठी 27 मतांची गरज असते. सुरक्षित मतांसाठी हा आकडा 29 मतांचा पकडला जातो 27 मतांप्रमाणे गणित केलं तर भाजपच्या चार शिवसेनेच्या दोन,  राष्ट्रवादीला दोन आणि कॉंग्रेसला एक जागा मिळू शकते पण कॉंग्रेसनं दोन जागांवर दावा केला आहे.


राज्यसभा निवडणुका, महामंडळ वाटप आणि निधीवाटपावरून कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर आधीपासून आहे. त्यात येत्या विधानपरिषेदत दोन जागांवर दावा केल्यानं कॉंग्रेस फ्रंटफूटवर येताना दिसतेय. विधानसभेत पराभूत झालेले, महामंडळांवर वर्णी न लागलेले किंवा दुस-या पक्षातून आलेल्या असे अनेक मंडळी विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत. जो नेता महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत ताकद पणाला लावून काम करेल त्यांना पहिलं प्राधान्य देण्याचा सर्वच पक्षांचा मानस आहे. कारण आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढाई होईलच असं नाही.  प्रत्येक पक्ष स्वबळावरही लढू शकतो त्यामुळे तितक्या ताकदीच्या नेत्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाऊ शकतं.


येत्या जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची एक जागा रिक्त होत आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत निवडणूक होऊ शकते. विधानपरिषदेवर सध्या भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि कॉंग्रेसचे एक सदस्य आहेत. विधानपरिषदेच्या एका सदस्य निवडीसाठी 27 मतांची गरज असते. सुरक्षित मतांसाठी हा आकडा 29 मतांचा पकडला जातो. 27 मतांप्रमाणे गणित केलं भाजपच्या चार, शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीला दोन आणि कॉंग्रेसला एक जाग मिळू शकते. उरलेल्या एक जागेवर  कॉंग्रेसनं आधीच दावा केलाय त्यामुळे महाविकास आघाडीत समसमान जागा वाटप होणार का? 
कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावं लागणार?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


सध्याचे सदस्य


भाजप 



  • सदाभाऊ खोत

  • सुजितसिंह ठाकूर

  •  प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते 

  • विनायक मेटे

  • रामनिवास सिंह


शिवसेना 



  • सुभाष देसाई, मंत्री 

  • दिवाकर रावते 


राष्ट्रवादी कॉंग्रेस
 



  • रामराजे निंबाळकर, सभापती 

  • संजय दौंड


स्थानिक स्वराज्य संस्था 



  • रविंद्र फाटक, शिवसेना 


राज्यपाल नियुक्त जागांवर ज्यांची अद्याप वर्णी लागली नाही त्या सगळ्यांचा मोर्चा आता या निवडणुकीकडे वळाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी दिल्यानंतरही राज्यपालांकडून त्या 12 जागांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या 10 जागांवरही राज्यपाल नियुक्त उमेदवारांचा डोळा आहे. 


विधानपरिषेदतल्या 10 जागांवर काही नेत्यांची पुन्हा वर्णी लागू शकते तर काही नविन चेह-यांना संधी मिळू शकते. तर काहींचं परिषदेच्या माध्यामातून राजकीय पुनर्वसन झालेलं दिसू शकतं. प्रत्येक पक्षात नेत्यांचा गट आहे. या इच्छुकांनी आपल्या नेत्यांला वशिला लावण्याचं काम सुरु केलं. पण त्याचबरोबर ज्यांचा नंबरच अद्याप आलेला नाही ते राज्यपाल नियुक्तीसाठी कागदावर असलेले उमेदवार देखील नंबर लावून उभे आहेत. तेव्हा राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेचेही निवडणुक चांगलीच रंगणार यात काही शंका नाही.


संबंधित बातम्या :