Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचं स्वरुप बदललं, केंद्राच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर फडणवीस-चव्हाणांची स्तुतीसुमने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत स्तुतीसुमने वाहिली आहेत.

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2026 रोजी आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची यशस्वी 12 वर्षे पूर्ण केली आहेत. मोदींच्या या दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेच्या एका तपानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या गेल्या 12 वर्षांतील कामगिरीवर स्तुतीसुमने वाहिली.
देशाचा आणि महाराष्ट्राचा GDP तिप्पट ते चौपट वाढला
या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींचे 12 वर्षांतील कार्य एवढे मोठे आहे की ते एका पुस्तकात मांडणे कठीण आहे. देशातील 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश आले आहे. भारताचा जीडीपी (GDP) 2013-14 मध्ये 103 लाख कोटी रुपये होता, तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच थेट तिप्पट वाढला आहे.
तसेच महाराष्ट्राचा जीडीपी (Maharashtra GDP) 2013-14 मधील 13 लाख कोटींवरून 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढला आहे. हा विकास केवळ घोषणांनी झाला नसून त्यामागे मोदींची विकासाभिमुख नियोजनबद्ध रणनीती आहे."
भारताची 'मेक फॉर वर्ल्ड'च्या दिशेने वाटचाल
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, देशात फक्त सरकारी अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभे करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. मोदींनी देशात 'मेक इन इंडिया' (Make in India) ही चळवळ यशस्वीरित्या राबवून आता भारताची वाटचाल 'मेक फॉर वर्ल्ड'च्या दिशेने सुरू केली आहे. हर घर शौचालय आणि उज्वला गॅस योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांमुळे देशातील शेवटच्या माणसाला सन्मानाचे आयुष्य मिळाले आहे.
मोदीजी म्हणजे राष्ट्रसेवेसाठी समर्पित 'राष्ट्र तपस्वी'
या सोहळ्यादरम्यान भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. चव्हाण म्हणाले, "काही व्यक्ती अध्यात्मातून तपस्या करतात, तर काही कला-साहित्यातून समाजासाठी जगतात; पण मोदीजींनी स्वतःला पूर्णपणे राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे, म्हणूनच ते खरे 'राष्ट्र तपस्वी' आहेत.
गेल्या एका तपामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेला बदल प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे. पारदर्शक शासनपद्धतीमुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकरी, कामगार, गरीब आणि वंचितांच्या बँक खात्यांपर्यंत पोहोचला आहे."
काय आहे या विशेष संग्राह्य अंकात?
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली की, 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' हा केवळ एक अंक नसून नव्या भारताच्या परिवर्तनाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या पुस्तकात अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा भारत, मातृप्रधान भारत आणि विकसित भारत 2047 (Developed India 2047) यांसारख्या 12 महत्त्वाच्या विषयांवर तथ्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. भारताने जागतिक स्तरावर निर्माण केलेला प्रभाव आणि सीमांवर शत्रूला दिलेले सडेतोड उत्तर यावरही यात विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
या दिमाखदार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे आणि आमदार सुनील राणे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















