नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 2 एप्रिल रोजी काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. खूप प्रतीक्षेनंतर आज भारतीय जनता पक्षानेदेखील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची सुरुवात रोजगाराने करण्यात आली आहे, तर भाजपच्या जाहीरनाम्याची सुरुवात ही दहशतवादाविरोधात झिरो टाँलरन्सने केली आहे.


दोन्ही पक्षांनी स्वतःचे जाहीरनामे वेगवेगळ्या पद्धतीने मांडले. भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी खूप मोठी भाषणं दिली. परंतु त्यानंतर भाजप नेत्यांनी पत्रकारांचा एकही प्रश्न घेतला नाही. त्याउलट राहुल गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा मुद्देसुद आणि आटोपशीर भाषणाद्वारे मांडला. त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वतः पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. भाषणांऐवजी प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी राहुल गांधी यांनी अधिक वेळ दिला.

काय आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात?
काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा काँग्रेसने केली. प्रत्येक वर्षी 20 टक्के गरिबांच्या खात्यात 72,000 रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने या योजनेसाठी 'गरीबी पर वार, हर साल 72 हजार' चा नारा दिला आहे. 22 लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. 10 लाख लोकांना ग्रामपंचायतींमध्ये रोजगार देण्याचं वचन दिलं आहे. जीडीपीचा 6 टक्के भाग शिक्षण क्षेत्रावर खर्च केला जाईल. यासोबतच काँग्रेसने सत्तेत आल्यावर देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात
भाजपने यावेळी पुन्हा एकदा राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले आहे. 75 वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठ स्थापन करणार. 2022 पर्यंत देशातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, छोट्या दुकानदारांना पेन्शनची योजना, कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी 25 लाख कोटी रुपये गुंतवणूकीचे आश्वासन, शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये, तसेच 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शनची सुविधा देण्याचे आश्वासन, 1 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज नाही, तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपये गुंतवणूक आणि सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी 1 लाख कोटी रुपये देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याद्वारे दिले आहे.

भाजपचा जाहीरनामा | व्हिडीओ



काँग्रेसचा जाहीरनामा | व्हिडीओ



भाजपचा जाहीरनामा | सुषमा स्वराज यांचं भाषण | व्हिडीओ