Baba Adhav: 'बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मविआ'; आत्मक्लेश आंदोलन अन् आरोपांवर सदाभाऊ खोतांचा सवाल, म्हणाले, 'जनतेचा कौल पचवता...'
Baba Adhav: बाबा आढाव यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल ईव्हीएम बद्दल तसेच निवडणुकीआधी जाहीर केलेल्या योजना आणि पैशांचा गैरवापर याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Baba Adhav: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आलेले निकाल त्याचबरोबर ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. या प्रकरणी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी तीन दिवस आत्मक्लेश उपोषण केलं होतं. काल (शनिवारी) त्यांनी आपलं आत्मक्लेश उपोषण मागे घेतलं. बाबा आढाव यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल ईव्हीएम बद्दल तसेच निवडणुकीआधी जाहीर केलेल्या योजना आणि पैशांचा गैरवापर याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी बाबा आढाव यांच्यावर हल्लाबोल करत उलट सवाल उपस्थित केला आहे.
बाबा आढाव यांनी काल केलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना, कॉंग्रेसने आणलेले ईव्हीइम मशीन काँग्रेसच्या काळात आढाव यांना योग्य दिसत होते का? मुस्लिम बहुल भागातील मते नाही तिच्या विरोधात गेली तिथे ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली नाही असे आढाव यांना वाटत नाही का? असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत बाबा आढाव यांना लक्ष केलं आहे.
नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?
'बाबा आढाव यांच्या बाबतीत मला प्रचंड आदर आहे. ते समाजसेवक होते. त्यांनी अनेक आंदोलने केली. अनेकांना न्याय मिळवून दिले. परंतु काल त्यांनी जे केलेलं आंदोलन होतं त्या आंदोलनाला माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याच्या मनात अनेक शंका निर्माण झालेले आहे. ईव्हीएम मशीन हे काँग्रेसच्या काळात आलं. त्या काळात बाबा आढाव यांना त्या काळातलं मशीन योग्य वाटतं होत्या का? हा मला पडलेले एक प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर मुस्लिम बहुल परिसर होता. त्या ठिकाणी मतं ही महायुतीच्या विरोधामध्ये पडलेली आहेत दिसून येत आहेत. मग मुस्लिम बहुल समाज जिथे होता त्या ठिकाणची जी ईव्हीएम मशीन होती ही मशीन योग्य चाललेली होती का या मशीनला तिथे गडबड करायची का वाटलं नाही म्हणजे याचा अर्थ सरळ आहे. आदरणीय बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत आहे. हे आता यातून स्पष्ट झालं आहे. त्यांना भेटी द्यायला येणारे नेते जर पाहिले तर आगीत तेल कोण होतं आहे हा महाराष्ट्र चांगला ओळखतो असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
बाबा आढाव साहेब सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचा मला आदर आहे तरी आपण ईव्हीएमवर टीका करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावी.मुस्लिम बहुल भागात EVM मशीन महाविकास आघाडीसाठीच कशी काय सेट होते? तिथे महायुतीला कमी मते मिळतात, मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?असे प्रश्न आता जनतेला पडले आहेत pic.twitter.com/bGyGuzUiuR
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 1, 2024
सदाभाऊ खोत यांची सोशल मिडिया पोस्ट
बाबा आढाव यांच्या भूमिकेवर आमदार सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. "बाबा आढाव साहेब, सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचा मला आदर आहे; तरी आपण ईव्हीएमवर टीका करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावी. मुस्लिम बहुल भागात ईव्हीएम मशीन महाविकास आघाडीसाठीच कशी काय सेट होते? तिथे महायुतीला कमी मते मिळतात, मग तिथे 'सेटिंग' का होत नाही? असे प्रश्न आता जनतेला पडले आहेत".
"जनतेचा कौल पचवता आला नाही की अशा आरोपांचा आधार घेतला जातो. विज्ञान युगात अशा निराधार आरोपांनी लोकशाहीची विश्वासार्हता कमी होत नाही, तर आरोप करणाऱ्यांची होत असते", असंही पुढे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























