नागपूर : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या महाविद्यालयांनी भरारी घेतली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांमधून मनपाने 99.23 टक्के निकालाची नेत्रदिपक कामगिरी नोंदविली आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तिनही शाखांसह मागासवर्गीयांमधून प्रथम येण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी नाजू राजेंद्र वासनीक हिने सर्वाधिक 89.33 टक्के गुण प्राप्त करून पटकाविला आहे. बारावीत घवघवीत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचे, शिक्षकांचे व पालकांचे नावलौकीक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आज मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सन्मानित करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, राजेंद्र सुके, संजय दिघोरे आदी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या यशासाठी शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून शिक्षक, मुख्याध्यापकांद्वारे करण्यात येत असलेल्या परिश्रमाचे फलीत आज विद्यार्थ्यांनी आपल्या यशामधून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांच्या स्वत:च्या परिश्रमासह शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी घेतलेली मेहनत आणि पालकांनी मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयांवर दाखविलेल्या विश्वासाचे मोठे योगदान आहे.


कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत होउ नये यासाठी शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण करण्यात आले होते. त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांची अडचण दूर करून त्यांच्या यशातील अडथळे दूर करण्यासाठी उचलेले पाउल महत्वाचे ठरले असून त्यातून विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग सुकर झाल्याचेही ते म्हणाले. मनपाच्या शाळांचे विद्यार्थी हे खासगी शाळांच्या तुलनेत कमी ठरू नयेत यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी पुढे आणखी मेहनत घेउन विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी सक्षम करावे, असेही आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले.


यावेळी मनपा आयुक्तांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्यासह पालकांशी हितगुज केली. विद्यार्थ्यांचे पुढील ध्येय, त्यांची तयारी याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बारावीच्या परीक्षेत मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखेमध्ये उत्कृष्ठ कामगिरीचे प्रदर्शन केले. विज्ञान शाखेमधून नाजू राजेंद्र वासनीक ने 89.33 टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. नाजू ही मागासर्गीय गटातूनही पहिली ठरली आहे. नाजू ची आई मनपाच्या शिक्षण विभागात कार्यरत आहे. विज्ञान शाखेतून सुरज सुधाकर पवार ने 86 टक्के गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्याच्या वतीने त्याच्या आई-वडीलांनी सन्मान स्वीकारला. समीर शैलेंद्र जांभुळकर याने 85.67 टक्के गुण संपादित करीत तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली. समीरचा थोरला भाऊ नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. समीरला सुध्दा भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. तिनही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. 


कला शाखेमध्ये मुस्कान परवीन मोहम्मद रफीक हिने 77.50 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर शबनम परवीन मोहम्मद शमीम हिने 74.67 टक्क्यांसह दुसरा व आयेशा परवीन मोहम्मद निसार हिने 70.67 टक्क्यांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला. विशेष म्हणजे तिन्ही विद्यार्थीनी मनपाच्या एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. 
वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. 76.50 टक्क्यांसह सफुरा इरम मोहम्मद मुर्तजा अंसारी ने प्रथम, 75.83 टक्क्यांसह सादिया परवीन समशेर आलम ने द्वितीय आणि 57.17 टक्क्यांसह हुस्ना अंजूम फारूख मजीद खान ने तृतीय स्थान मिळविले. दिव्यांग विद्यार्थ्यांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थीनी वैष्णवी शांताराम तेलरांधे हिने 63 टक्क्यांसह यश मिळविले. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या नाजू राजेंद्र वासनीक ने 89.33 टक्के गुणांसह मागासवर्गीयांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला.


यंदा बारावीच्या परीक्षेत मनपाच्या चारही कनिष्ठ महाविद्यालयांचा एकूण निकाल 99.23 टक्के एवढा लागला असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, साने गुरूजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालय आणि ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्याचा 100 टक्के निकाल लागलेला आहे. तर एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रत्येकी 96.94 टक्के निकाल लागला आहे. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी केले तर आभार राजेंद्र सुके यांनी मानले.


 


इतर महत्वाचे


बारावी निकालात विदर्भाची बाजी ; राज्यात नागपूर विभाग दुसऱ्या तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर


12 वी नंतर काय कराल? जाणून घ्या शिक्षणाच्या संधी


अपयश आलं म्हणून खचू नका, पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी करा; मुख्यमंत्री ठाकरेंचा सल्ला 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI