Thane Bhiwandi Accident : काल फ्लॅट बघायला जाताना दुचाकी खड्ड्यात गेली, महिला थेट ट्रकच्या चाकाखाली, आज TDRF चा जवानाचं डिव्हायडरवर डोकं आपटलं, भिवंडीत खड्ड्यांचे बळी
Thane Bhiwandi Accident : राज्यभरातील अनेक शहरात सध्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या (Potholes) मुद्द्यांवरून राजकारण तापलं असताना या संदर्भात आता आणखी एक संतापजंनक प्रकार समोर आला आहे.

Thane Bhiwandi Accident : राज्यभरातील अनेक शहरात सध्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या (Potholes) मुद्द्यांवरून राजकारण तापलं असताना या संदर्भात आता आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. भिवंडीमध्ये जीवघेण्या खड्ड्याने एका निष्पाप महिलेचा बळी घेतला आहे. खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्याने मागून येणाऱ्या ट्रकखाली आल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी आणखी एक जीव घेतला आहे. शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे TDRF पथकातील एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला असून त्यात सर्वसामान्यांचा बळी जात असल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. (Thane Bhiwandi Accident)
ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. खड्ड्यात दुचाकी गेल्याने ती घसरली आणि रस्त्यावर पडलेल्या महिलेला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Thane Bhiwandi Accident: खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरली, अन् पुढे....
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सुनिता अक्षयलाल पाल (वय 46) असे असून त्या ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील रहिवासी होत्या. त्यांचे पती अक्षयलाल पाल यांच्यासह त्या भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून येत होत्या. राहणाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात गेली आणि घसरली. अपघातात अक्षयलाल पाल हे रस्त्याच्या कडेला पडले, तर सुनिता पाल या रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अक्षयलाल पाल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत. दरम्यान, भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक काँक्रीट रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वारंवार अपघात घडत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत, तसेच दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Thane Accident: रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला
दुसरीकडे, मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी आणखी एक जीव घेतला आहे. शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे TDRF पथकातील जवान विकास लहू गोरे (वय 31) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे आज सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावर निघाले होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत त्यांनी जीवाची बाजी लावून बचावकार्य केले होते. मात्र, इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचा जीव महामार्गावरील खड्ड्यामुळे गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.






















