Raigad Crime रायगड : रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहन चालक निलेश ढवळे यांच्या हत्येच्या प्रकरणात आणखी नवी माहिती पुढे आली आहे. रायगडच्या (Raigad News) म्हसळा तालुक्यातील वांगणी हद्दीत घडलेल्या या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेत दोन जिगरी मित्र हे अंधाऱ्या रात्री शिकार करायला निघतात. मात्र, शिकार करताना अचानक बंदुकीची गोळी शिकार ऐवजी जेव्हा मित्राच्या छताडीत घुसते (Raigad Crime) आणि निलेश ढवळे या 34 वर्षीय तरुणाचा दुदैवी अंत होतो. शिकारीला सोबत जाणारे जिगरी मित्र शिकारीच्या नादात मात्र दुसऱ्याचा जीव घेऊ शकतात, हे तितकंच विचार करणारे आहे.  


शिकारीच्या छंदाने घेतला मित्राचा जीव?


रायगडच्या म्हसळा तालुक्यातील पाष्टी  येथून निलेश ढवळे यांचे खास मित्र असलेल्या अक्षय गोलांबडे याने 28 मे रोजी निलेशला शिकारी करण्यासाठी गाडीत बसवले. त्यानंतर ते दोघे मोरवणे मार्गे ते वांगणी येथे शिकराच्या  शोधात आले. मात्र वांगणी मेन रोड पासून 2 किलोमीटर आत जंगलामध्ये असे काय घडले की, अक्षय गोलांबडे याने निलेश ढवळे या आपल्या जिगरी मित्राला आणलेल्या बेकायदेशीर बंदुकीतूनच गोळी मारून संपवले.


मृतदेहाला दगड बांधून फेकले डोहामध्ये  


या घटनेनंतर अक्षय इथेच थांबला नाही, तर खून केलेल्या स्थळावरचे रक्ताचे पुरावे नष्ट करण्यासाठी तेथील नमुने माती टाकून पुसले.  त्यानंतर निलेशच्या मृतदेहाला एक दगड बांधून एक भल्या मोठ्या डोहामध्ये फेकून दिले. सोबतच बंदूकीतील काडतूस निलेशच्या खिशात ठेऊन, बंदूक देखील त्याच डोहात फेकून दिली. दरम्यान, निलेश घरी परतला नसल्याने त्याचे  कुटुंबीय आणि  गावकरी त्याला जंगलात शोधण्यासाठी गेले. यात तब्बल दोन दिवस संशयित आरोपी अक्षय त्यांचा कुटुंबासोबत मृतदेह शोधण्याचा नाटक करून शोध घेणाऱ्या सर्वांची दिशाभूल करत होता. यावेळी तो दुसरीकडेच शोधण्यासाठी घेऊन जायचा. मात्र 30 मे रोजी पोलिसांना अक्षयवर संशय आल्याने त्यांनी आपली तपासची सूत्रे त्या दिशेने फिरवली आणि अखेर अक्षयला आपल्या जाळ्यात पकडले .


मृतदेह डोहातनू बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश


यात संशयित आरोपी अक्षयने झालेली घटना पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू टीम बोलावून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. अखेर आज शुक्रवारी दुपारी 12:30 च्या सुमारास निलेश यांचा मृतदेह डोहातनू बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. यानंतर हा मृतदेह म्हसळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र शरीरात असणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या आणि उर्वरित तपास यासाठी शाव विश्चेदनसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. अक्षय याने वापरलेले बंदूक डोहातून काढण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्न करीत आहे.


तर म्हसळा पोलिसांनी बेपत्ता असलेल्या निलेश याचा खून झाला असल्याचा तपास तीन दिवसात लावल्यामुळे तालुक्यातून त्याचे देखील कौतुक होत आहे. मात्र अवैध बंदूक आणि जिवंत काडतूस अक्षयने आणली कुठून? तसेच तालुक्यातील कोणाकोणापर्यंत याचे धागेदोरे पोहचले आहेत? याचा शोध पोलीस घेतील अशी, आशा जनतेला आता लागली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या