Chandrashekhar Guruji : चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट
हुबळी येथील एका हॉटेलमध्ये चंद्रशेखर गुरुजींची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमध्ये निकटवर्तीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
![Chandrashekhar Guruji : चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट Chandrashekhar Guruji Murder Case Karnataka Police arrested two person viral video Chandrashekhar Guruji : चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/e51392551c11b114e2af9275a8e617ae1657024447_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव: गुरुजी डॉ.चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
हे दोघेही चंद्रशेखर गुरुजी यांच्याकडे काम करत होते. गुरुजींनी वनजाक्षी आणि मंजुनाथ यांचा स्वतः पुढाकार घेवून विवाह केला होता. नंतर त्यांना प्लॉटदेखील दिला होता. 2019 पर्यंत हे गुरूजींच्याकडे काम करत होते. नंतर त्यांनी काम सोडले. काम सोडल्यावर गुरुजींनी त्यांच्याकडे प्लॉट परत करण्याचा तगादा लावला होता.
गुरुजींची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून शोध सुरू केला होता. एसीपी विनोद यांच्या पथकाने मारेकऱ्यांना रामदुर्ग येथे ताब्यात घेतले आहे.
चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
चंद्रशेखर गुरुजींचा प्रवास
चंद्रशेखर गुरुजी यांची लहानपणापासूनच अध्यात्माकडे ओढ होती. आठ वर्षाचे असताना त्यांनी आपल्या गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी वर्गणी गोळा करून जीर्णोध्दार केला होता. चौदा वर्षाचे असताना त्यांनी भारतीय सेनेत दाखल होण्याची मनीषा बाळगली होती. पण नंतर आरोग्याच्या प्रश्नामुळे त्यांना ते जमले नाही. नंतर त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदवी संपादन करून मुंबईत कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय सुरू केला. 1995 साली शरण संकुल ट्रस्ट स्थापन करून सामाजिक कार्याला प्रारंभ केला.
स्वप्नाने दिशा बदलली
एक दिवशी चंद्रशेखर गुरुजींना सुंदर घराचे स्वप्न पडले. त्यामुळे त्यांनी वास्तूशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि हे शास्त्र दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन करण्यास प्रारंभ केला. यू ट्युबवर त्यांनी वास्तूशास्त्राचे व्हिडीओ अपलोड केले त्याला लोकांचा अलोट प्रतिसाद लाभला. अनेक वाहिन्यांवर त्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील होत होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)