मन हेलावणारी घटना; पत्नीला माहेरी सोडलं, 4 मुलांना विहिरीत ढकलून वडिलांनीही संपवलं जीवन, विदर्भ हादरला
जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील संबंधित मृत व्यक्ती असून आज सकाळी त्याने पत्नीला माहेरी सोडलं.

बुलढाणा: जळगाव जामोद (Buldhana) तालुक्यातील राजुरा गावातून मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील धरण परिसरात एका विहिरीत (Well) वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील व्यक्ती हा आदिवासी समाजाचा असून त्याने आपल्या चार मुलांना विहिरीत टाकून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील संबंधित मृत व्यक्ती असून आज सकाळी त्याने पत्नीला माहेरी सोडलं. त्यानंतर, गावी परत येताना त्याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत. घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया व पियुष किराडिया यांसहसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत जीवन संपवलं. बापाने आधी मुलांना विहिरीत ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल या इसमाची पत्नी घरगुती वादातून माहेरी निघून गेली होती. आज सकाळी घरातील घरकाम करत असताना या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी " तू स्वतः काम का करतो तुझी बायको कुठे गेली..?" असं विचारलं. त्यातूनच झालेल्या घरगुती भांडणातून विजय किराडीया याने आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली.
हेही वाचा





















