मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेग्युलेटेड मार्केटमध्ये आता बदल करण्याचा निर्यय घेतला आहे. 18 एप्रिलपासून आता बाजार सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. आरबीआयने याबाबत एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला असून इतर व्यवहारही सामान्य झाले आहेत. त्यामुळे वित्तीय बाजारातील व्यवहार आता सकाळी 9 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Continues below advertisement


सकाळी 9 ते 3.30 पर्यंत व्यवहार
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बाजाराची सुरुवात ही सकाळी 10 वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या कोरोना नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इतर व्यवहारही सर्वसामान्य झाले आहेत. त्यामुळे आता 18 एप्रिलपासून बाजारातील व्यवहार हा पुन्हा एकदा सकाळी 9 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. हा व्यवहार दुपारी 3.30 पर्यंत सुरू राहणार आहे. 


 




या बदललेल्या वेळेमुळे आता परकीय चलन विनिमय बाजार आणि सरकारी प्रतिभूतींच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार हा सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी नवीन पतधोरण जाहीर केल्यनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


आरबीआयचे पतधोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी आपले पतधोरण जाहीर केले. यंदा अपेक्षेनुसार व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. तर, रिर्व्हस रेपो रेट 3.75 टक्के इतका ठेवण्यात आला आहे. सलग अकराव्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :