शेवटी जे घडू नये वाटत होत तेच घडलं, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन करुन जर विनाकारण गर्दी टाळली नाही तर पुन्हा लॉकडाउन करावे लागेल असा इशारा द्यावाच लागला. खरं तर संपूर्ण देशात 30 जून पर्यंत लॉकडाउन याअगोदरच जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, या बंदीत राज्यांना काही अधिकार देण्यात आलेले आहे. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करून आर्थिक व्यवहार टप्याटप्याने सुरु व्हावेत, याकरिता राज्य शासनाने या बंदीच्या काळात काही प्रमाणात शिथीलता दिली होती. बराच काळ लोकांनी लॉकडाउनमध्ये काढला होता. सर्वच लोकांना या कोरोनाच्या आजाराचं गांभीर्य आल्याने लोकं आता शिस्तीत वागतील अशी अपेक्षा होती. मात्र, घडलं भलतंच. झुंडीच्या-झुंडीने नागरिक रस्त्यावर उतरले कुणी विनाकारण, कुणी कारण घेऊन. ओळखायचं तरी कसं, कुणी आणि किती वेळा. प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा. मनात येईल तेव्हा खाली उतारतोय, अशा परिस्थितीत कसं वागायचं ही जबाबदारी नागरिकांची आहे. अजून वेळ निघून गेलेली नाही, स्वतःला आवर घाला. कोरोना जैसे थे तसाच आहे.


जून 6, झुंबड कशासाठी? या शीर्षकाखाली, शिथिलतेचा गैरफायदा घेऊन नागरिक कसे सुसाट पद्धतीने रस्त्यावर उतरले आणि हिंडतायत याच्यावर सविस्तर लिहिले होते. लॉकडाउनमुळे मे महिन्यात निश्चितच रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात शासनाला यश प्राप्त झाले होते.


ज्या पद्धतीने कोरोनाने बरे होऊन रुग्ण घरी जाण्याचं प्रमाण वाढत आहे. त्याप्रमाणेच जून महिन्यापासून दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच वाढतच आहे. त्यात विशेष म्हणजे मुंबई शहरातील प्रमाण काही फारसं कमी झालेलं नाही. बुधवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 149 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. 3 हजार 254 रुग्णाचं निदान झालं असून 1 हजार 849 रुग्ण बरे होऊन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 46 हजार 074  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या सगळ्या आकडेवारीवरून आजही राज्याती कोरोना बाबतीतील गांभीर्य लक्षात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये याकरिता अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचे निर्बंध कायम आहेत.


खरं तर मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, या शहरातील हॉटस्पॉट बनलेल्या धारावी आणि वरळी कोळीवाडा या दोन्ही भागातील कोरोनाबातितांची वाढती संख्या रोखण्यात यश प्राप्त झालेले आहे. तरीही अन्य भागातून रुग्ण वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा भर पावसात रुग्णांना सेवा देण्याकरिता रात्र-दिवस झटत आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन रुग्णांना उपचार देण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी करत आहेत. रुग्ण संख्या कमी व्हावी, बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यासाठी अलगीकरण आणि विलगीकरणाची जय्यत तयारी करून ठेवण्यात आली आहे. जंबो फॅसिलिटी निर्माण करून फिल्ड हॉस्पिटलमध्ये काही प्रमाणात डॉक्टरांना आणि संबंधित कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम करत आहेत, कुणालाही अत्यावश्यक सेवेपासून शासनाने वंचित ठेवलेलं नाही.


शिथीलता देताना शासनाने काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या, त्याचं मात्र कुठेही पालन होताना दिसत नाही. अनेकांनी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर ठेवले होते, सामाजिक अंतराचे पालन लोकं करताना दिसत नव्हते. प्रशासनाने हे नियम आरोग्याच्या दृष्टीने घालून दिले आहे. कोरोनानंतरच आयुष्य निश्चितच वेगळं असणार आहे याची व्यवस्थित माहिती असताना सुद्धा लोक मोकाट रस्त्यावर बिनधास्त बागडताना दिसत आहे. सध्या तर तो बसचा एक विडिओ वायरल झाला आहे. त्याच्यामध्ये लोकं ज्यापद्धतीने बस मध्ये चढताना दिसत आहे, ते बघितल तर कोरोना आपल्याकडून हद्दपार झाला की काय अशी शंका येते. एकमेकाला ढकलत लोकं बसमध्ये शिरताना दिसत आहे. अर्थात ही सर्वस्वी चूक लोकांची नाही, काहींची कार्यालये चालू झाली आहे. कार्यलयात येण्याच्या आदेशाने लोक बसमध्ये शिरणारच कारण या लॉकडाउनच्या काळात अनेक लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे ज्यांच्या हाताला नोकरी आहेत ते बोलावलं आहे म्हणजे जाणारच.


वाहतूक व्यवस्थेमुळे होणारी समस्या याची शासनाने दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी याकरिता अत्यावश्यक सेवेतील काम करण्याऱ्या लोकांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. पावसाळा सुरु झाला आहे, अशा काळात आरोग्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे असं सध्या वातावरण आहे. आजही अनेक कोरोनाबाधित रुग्णांना बेडसाठी रुग्णालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. अजूनही म्हणावी तशी परिस्थिती चांगली झालेली नाही, नक्कीच अशक्य अस काही नाही. मात्र, या आजाराचं वर्तन इतर आजारापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. कुणाला सगळं आलबेल सुरु आहे असं वाटत असेल तर तसं अजिबात चित्र नाही, आपल्याला आणखी काही काळ जोपर्यंत प्रशासन सांगत नाही तो पर्यंत सर्व काळजी घेऊनच वावर करायचा आहे. शासन आणि प्रशासन सगळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावेत म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत आहे त्यांना सहकार्य करणं प्रत्येक नागिरकांची जबाबदारी आहे.


शासन तुम्ही कसं वागावं हे शिकवत बसणार नाही. कोरोनासंदर्भातील संभाव्य धोके याची तुम्हाला यापूर्वीच सूचना आणि माहिती देण्यात आली आहे. आता लोकांनीच ठरवायचं कसं जगायचं, सुरक्षित जगायचं की सक्तीच्या बंदीवासात, निर्णय आपल्या हातात आहे. त्यामुळे 'समजदारो को इशारा काफी है'  जर नाहीच ऐकायचं ठरवलं आणि येरे माझ्या मागल्या चालूच ठेवली तर लॉकडाउन निश्चितच म्हणावा लागेल.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग