एक्स्प्लोर
रेड लाईट डायरीज : तळतळाट...
मागच्या वर्षी ताजुद्दीन मरण पावल्याची बातमी कानावर आली या दोघींची आठवण झाली. ताजुद्दीनची खातेनिहाय चौकशी निघाली होती. बेनामी माया जमवणे, पदाचा गैरवापर करणे असे आरोप त्याच्यावर लावले होते. त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली.

सिनिअर पीआय असणाऱ्या ताजुद्दीनना दादर चेन्नई एक्सप्रेसमधल्या एका फिमेल एस्कॉर्टची टिप दिलेली होती. रेल्वेतील सर्च-रेडपूर्वी रेल्वेच्या नियमानुसार त्यांना रेल्वे पोलिसांना कळवणे भाग होते. कारण रेल्वे स्टेशनवर जाऊन कारवाई करण्याआधी रेल्वे पोलिसांची परवानगी आणि सहकार्य बंधनकारक असते. त्यामुळे त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन पुढे पास आऊट झाली. दरम्यान, सर्च वॉरंट काढले गेले. सगळी तयारी झाली. रात्री बाराच्या सुमारास ट्रेन प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. आधीच 'टीप' आल्यामुळे अलर्ट असलेल्या रेल्वे पोलिसांनी ती बोगी नेमकी घेरली. गाडीला दहा मिनिटाचा थांबा असूनही तेवढ्या वेळेत डब्यातील 'तो' ग्रुप बरोबर हेरता आला. 16 जणी होत्या त्यात. दोन अल्पवयीन आणि 14 प्रौढ. 14 पैकी चार 'भाकड' झालेल्या. त्यातलीही एक खुडूक व्हायच्या बेताला आलेली. पण तीच ‘बॉस’ होती. अल्पवयीन मुली बहुधा युपी-हिमाचल कडच्या होत्या. रेशम आणि मेराज त्यांची नावं. कमालीचा गौर वर्ण, नुकतेच वयात येत असल्याची जाणीव जागोजागी दर्शवणारा अन बऱ्यापैकी उंची असलेला सुडौल बांधा, घारे पाणीदार डोळे, दाट रुंद भुवया, दाट कुरळे केस, कपाळावर रुळणारी केसांची महिरप, भव्य कपाळ, मोठा चेहरा, धनुष्याकृती नाजूक ओठ, सरळ नाक, गालाची ठेवण वर आलेली, चेहऱ्यावर नजर न ठरणारी देहबोली. अंगातला सलवार कुर्ता मळकटून गेलेला. चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह. पकडल्या गेल्या तेव्हा त्या दोघी हातुपे दुमडून उभ्या होत्या. मधूनच बारीक आवाजात एकमेकीशी बोलत होत्या. इतर बायकांशी त्या खचितच बोलत नव्हत्या. बाकी बायकाही त्यांच्याशी बोलत नव्हत्या. बहुतेक त्या दोघीं त्यांच्यात नव्याने सामील झालेल्या. त्यातल्या ज्या मध्यमवयीन होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरची रेष हलत नव्हती. एकीने तर पोलिसांच्या देखतच अगदी कंबरेला पदर खोचून तोंडात माव्याची नवी कुमक भरली. ज्यांची धंद्यातली उमर सरत आली होती, त्या तिघी-चौघी मात्र आपण या गावच्याच नसल्याच्या अविर्भावात उभ्या होत्या. एकीने मात्र तोंडाचा पट्टा सुरु केला जेणेकरून लोकांचं लक्ष वेधलं जावं. पण याची तिला फारशी गरज पडली नाही. पोलीस आणि या 'अशा' बायकांचा घोळका पाहून हा काही तरी वेगळाच प्रकार आहे, याची जाणीव होताच रात्रीची वेळ असूनही स्टेशनवरचं निम्मं पब्लिक तिथं जमा झालं होतं. यामुळे कातावलेल्या पोलिसांनी सर्वाना हुसकून लावलं. जमाव पांगला. लोक दूर जाऊन उभे रहिले. पण तरीदेखील सर्वांची नजर त्या अल्पवयीन मुलींवर खिळून होती. याला पोलीस देखील अपवाद नव्हते.
चन्नव्वा सर्वात वयस्क बाई होती, ती बारकाईने सगळं निरीक्षण करत होती. पोलिसांची चर्चा कान देऊन ऐकत होती. तिला बहुधा मराठी समजत तरी असावं किंवा ती तसा आव आणत होती. पोलिसांच्या खाणाखुणा आणि त्यांच्या हातातल्या कागदांवर ती लक्ष ठेवून होती. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना न अडखळता सगळ्या बायकांच्या वतीने सराईतपणे उत्तरे देत होती. तिच्या उच्चारातला दक्षिणी टोन स्पष्ट जाणवत होता. तर रेशम आणि मेराज तिच्या चेहऱ्याकडे मोठ्या आशेने बघत होत्या. त्यांच्याबरोबरचे दलाल मात्र अगदी अट्टल गुन्हेगारांना लाजवेल अशा पद्धतीने पोलिसांसोबत वागत होते. समोरचे दोन दात पडलेला, दाढीचं खुंट वाढलेला, गालावर वाराचे जुने घाव असणारा, तारवटलेले डोळे खोल गेलेला, केस विस्कटून गेलेला, तोंडातून देशीचा वास मारणारा, उभारल्यावर हेलखावे खाणारा मरतुकडा जगन्नाथ आणि वाट्टेल ‘ती’ पिऊन पोटाचं टायर झालेला, गांजा ओढून गालफडे वर आल्यागत दिसणारा काळाकभिन्न कातळपुरुष षण्मुगम असे दोन दलाल सोबत होते. दोघांचे कपडे चुरगळून गेलेले. जगन्नाथच्या अंगातले कपडे तर डगले अडकवल्यागत दिसत होते. षण्मुगमच्या अंगावर लुंगी बनियन होते, तेही कळकटून गेलेले. पकडले गेल्यापासून हातातला बिडीचा कट्टा त्याने निम्मा खलास केला होता. हा षण्मुगम महाबेरकी होता. त्याला तोडकं मोडकं मराठी कळत होतं. पण अजिबात बोलता येत नव्हतं. पोलिसांना ही बाब अगदी शेवटी उमगली ही बाब अलाहिदा.
षण्मुगम हा जगन्नाथच्या लेखी हिरो होता. त्याला माहिती होतं की, कितीही कसलंही झंझट आलं तरी षण्मुगम त्यातून पाय बाहेर काढून आपल्याला अलगद बाहेर काढणार. फार तर काही दिवस ‘आत’ बसावं लागेल. याचे आडाखे त्याने मनाशी बांधून ठेवले होते. आताही दातात काडी घालत तो षण्मुगमकडे चोरट्या नजरेने बघत होता. पोलिसांनी तिकीट तपासून पाहिलं, झडती घेऊन झाली, सोबतच्या पत्र्याच्या ट्रंका उचकून झाल्या. चन्नव्वा वगळता सर्व बायका शांत होत्या; आणि षण्मुगम आपल्या हातोटीने प्रकरण निभावून नेत होता. 'चन्नव्वा आपली मोठी भावजय असून ती मुंबईला कामास असते, बाकीच्या बायका तिच्या सोबत बांधकामाच्या साईटवर कामाला असतात. आता गावाकडे चन्नव्वाच्या मुलीचं लग्न काढलंय. तेव्हा तिच्या सांगण्यावरून तिला न्यायला आपण मुंबईला गेलो होतो, आता त्यांना घेऊन चेन्नईकडे निघालो आहोत, तिथून बसने गावाकडे जाणार आहोत' असा बनाव त्याने मांडला. चन्नवा त्याच्या नात्यातली होती हे खरंच होतं. पण भावजय नव्हती. साऊथकडे बायका नेण्या-आणण्याच्या रॅकेटची ती महत्त्वाची कडी होती. तर षण्मुगम हा सप्लायर होता. त्याला चेन्नईमधून टीप देणारा आणखी कोणी तरी वेगळाच असणार. चन्नवाकडे त्याने डिमांड कळवल्यानंतर तिने लोकल दलालांना हाताशी धरून बायकापोरींची गोळाबेरीज बरोबर केली होती. पण नवख्या अल्पवयीन मुलींची रिस्क तिला घ्यायची नव्हती पण बिदागीचा आकडा मोठा असल्याने ती तयार झाली होती. मात्र, या सर्व व्यवहारात ज्या दलालाने रेशम आणि मेराजला ज्याने मुंबईत आणलं होतं, त्याला ठरल्याप्रमाणे रक्कम दिली गेली नाही. परिणामी त्याने या मुली पुढे कुठे सप्लाय होतात यावर नजर ठेवली. आणि ट्रेन निघताच टीप फोडली. ती टीप स्टेशन हद्दीतील पोलिसांना द्यावी लागली. ताजुद्दीन तिथला सिनिअर पीआय होता. आता त्याने बरोबर ताडले होते की, या नाटकात चन्नव्वा आणि षण्मुगम हिच मुख्य पात्रे आहेत. बाकीचे मोहरे आहेत. त्यामुळे आपला सगळा रोख या दोघांवर ठेवला होता पण त्याच वेळी टोळीतील अल्पवयीन मुलींच्या मोहाने त्याच्या काळजात प्रचंड उलघाल सुरु होती. चौकशीत त्याचं पूर्ण लक्ष नव्हतं. अर्ध्या तासात त्याने चौकशी आटोपली खरी पण त्या मुली काही केल्या, त्याच्या डोक्यातून जात नव्हत्या. तोवर महाकाय लोखंडी रुळांना रगडत रेल्वे पुढे निघून गेली .
उंचापुरा आणि काहीसा धिप्पाड वाटणारा काळा षण्मुगम त्या लवाजम्यास चेन्नईला घेऊन जात होता. आपल्या चार मेट्रोपैकी फक्त चेन्नई हे एकच शहर असे आहे की, जिथे स्पेसिफिक एरियात वेश्यावस्ती नाही. मात्र, तिथे देशाच्या सर्व राज्यातून सर्व प्रकारच्या बायका-मुली आणून पुरवल्या जातात. तिथे घरगुती पद्धतीने मोठ मोठाल्या बंदिस्त बंगल्यात, अपार्टमेंटवजा इमारतीत, फार्म हाऊसमध्ये हा व्यवसाय चालतो. षण्मुगम ज्यांच्यासाठी हे घेऊन चालला होता ते तमिळनाडुमधलं मोठं धेंड होतं, हे नंतर यथावकाश कळलं. या सर्वांना रीतसर ताब्यात घेतलं गेलं. रेल्वे पोलिसांनी कागदपत्रे करून राज्य पोलिसांना कस्टडी दिली. सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यानंतर न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे उभं करण्यात आलं. पुढील सुनावणीपर्यंत महिला सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली. तर अल्पवयीन मुलींना रिमांड होममध्ये दाखल करण्याचे आदेश दिले गेले. असेच काही दिवस गेले आणि छाप्यात पकडलेल्या अल्पवयीन मुली रेशम आणि मेराज या दोघीजणी पळून गेल्या. वर्तमानपत्रात याची छोटीशी बातमी झळकून गेली. खरं तर त्या मुली पळून गेल्या नव्हत्या, तर त्यांना योजनाबद्ध पद्धतीने पळवून नेलं होतं. कागदोपत्री मात्र बरंच काही रंगवलं गेलं. त्या मुलींना कर्नाटकच्या हद्दीत असलेल्या ताजुद्दीनच्या फार्म हाऊसवर आणलं गेलं. अतिशय मधाळ सौंदर्याच्या जोडीस डोळ्यात कमालीची मादकता, पावलात वीजेसारखी चपळता, भान हरपून जावे, असा आवाजातला गोडवा त्या दोघींच्या ठायी होता. मर्जीतल्या अधिकारी लोकांना आणि मित्रांना घेऊन ताजुद्दीन तिथं ओल्या पार्ट्या करायचा. तिथं येणारे बडे शासकीय अधिकारी, राजकारणी, मित्र, हौसेगवसे आपली वासना शमवून घ्यायचे. कधी कधी आठवडाभर त्यांच्या अंगाला पुरुषांचा स्पर्श होत नसे तर कधी कधी एकाच दिवसात डझनावारी माणसांचा कंड जिरवावा लागे. त्या मुलींना हे सर्व नवं नव्हतं, मात्र याचा अतिरेक त्यांच्या क्षमतेपलीकडचा होता. कारण त्या धंद्यात येऊनच मुळात खूप दिवस झाले नव्हते, शिवाय त्यांची शारीरिक क्षमताही विकसित झालेली नव्हती. त्यामुळे त्या अक्षरशः गर्भगळीत होऊन जात, त्यांचा श्वास घुटमळू लागे, जीव नकोसा होई पण सांगणार कुणाला आणि कसे? या दुष्टचक्रातून बाहेर पडणे त्यांना जवळपास अशक्य होते. कारण एकतर त्यांना मराठी आणि कानडी या दोन्ही भाषांचा बिल्कुल गंध नव्हता, शिवाय या भागातील रस्त्यांची, परिसराची त्यांना अजिबात माहिती नव्हती. खेरीज ताजुद्दीनची नाराजगी ओढवून घेऊन त्यांना मदत करेन, असं तिथं कुणीच नव्हतं. यातून जे व्हायचं तेच झालं. अतिरेकी भोगानं रेशम गरोदर राहिली. तिला डॉक्टरांकडे नेऊन आणण्याची रिस्क घेण्यापेक्षा डॉक्टरांनाच त्याने शेतावर बोलवले. तिचा गर्भपात केला गेला. नंतर मेराजही गरोदर राहिली. असं पाच सहा वेळा झालं. ही गोष्ट त्या मुलींच्या सहनशीलतेच्या पलीकडची होती. बघता बघता दोन वर्षे निघून गेली. रोज नवीन ठिकाणी तोंड घालायला सोकलेल्या ताजुद्दीनचे त्यांच्या बद्दलचे आकर्षण किंचित कमी झाले. त्याच्या बदलीचीही कुणकुण सुरु होती, शिवाय त्याने इथे मुली ठेवल्याचा थोडाफार बोभाटा झालाच होता. कोकणात बदली करून घेऊन तिथं या मुली सोबत नेऊन कुठंल्या तरी मित्र कंपनीच्या फार्महाऊसवर नेऊन ठेवायच्या, असं त्याच्या डोक्यात घोळत होतं. इकडे रेशम आणि मेराजची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. अंगाचं चिपाड झालं होतं, तोंडावरचं तेज गेलं होतं, सगळी रया गेलेली. डोळे सदैव शून्यात; नजर ठरत नसे, इकडच्या उष्ण हवामानामुळे त्वचा रापून गेली होती, केसांचे बुरखंडे झालेले, कपड्यांची कळा उतरलेली, पोटपाठ एक झालेली; पाठीवर, मानेवर, छातीवर, मांडयांवर जागोजागी ओरखडयाचे निशाण उमटलेले. गालफाडे आत गेलेली, कपाळावर अकाली जाळ्या आलेल्या अन सुकून गेलेल्या ओठांच्या पाकळ्या. त्यांच्याकडे बघवत नव्हतं.
त्याची बदली गणेशोत्सवाच्या ताणामुळे पुढे ढकलली गेली. महिनाभर परत येणार नाही हे सांगून तो रेशम आणि मेराजचं पार आतडं कातडं शोषून आला. त्यानंतर तीन-चार दिवसांनी तिथं देवदासींचा फिरस्ता जत्था वाटेने जाताना पोटाला काही मिळतं का? हे पाहण्यासाठी आला. त्यातच एक होती सिताव्वा. (जिच्यावर मी पूर्वी वेगळा भाग लिहिला आहे). देवदासी बायका आल्यामुळे तिथं निगराणीला असलेल्या लमाण जोडप्याने त्यांची खातीरदारी केली. त्यांना खायला प्यायला दिलं. या दरम्यान वेगळ्याच आवाजाच्या गोंगाटाने रेशम आणि मेराज त्यांच्या खोलीबाहेर आल्या. त्यांना ही वाद्ये आणि हा जागर पूर्णतः नवा होता. त्या गोंधळून जाऊन पाहू लागल्या. सिताव्वाच्या अनुभवी नजरेने अचूक हेरले. ती भंडारा लावायच्या निमित्ताने जवळ गेली आणि आधी मराठी-कानडीत त्यांच्या कानात खुसपुसली. त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून मग हिंदीत बोलती झाली. तिच्या संवादाने त्यांचा चेहरा खुलला. सिताव्वाने त्यांना खुणावले आणि शांत राहण्यास, ओळख न देण्यास खुणावलं. काही वेळाने देवदासींचा हा जत्था निघून गेला. सिताव्वाच्या डोक्यात पुढची चक्रे सुरु झाली. ताजुद्दीन स्वतःच पोलीस दलात असल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस खात्यात तक्रार देऊन काम फत्ते होणार नाही, याची तिला खात्री होती. त्यामुळे तिने अन्य मार्ग चोखाळण्याचे ठरवले. दुसऱ्याच दिवशी आमच्या इथल्या काही जोगतीणी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सिताव्वाचा निरोप दिला. सर्व माहितीची खातरजमा करण्यात दोन दिवस गेले. ताजुद्दीनचे राजकीय संबंध बरेच मोठे असल्याने डोक्याने काम करायचे ठरवून त्याच्याकडील लमाण जोडप्याला विश्वासात घेऊन पुढचे पाऊल उचलणे कधीही योग्य राहील हे लक्षात घेऊन लमाण तांडयावरील दोन जोड्यांना जीपमध्ये घालून ताजुद्दीनच्या फार्म हाऊसकडे कूच केले. त्यांनी काम चोख केले. निगराणीस असलेल्या जोडप्याचे मन वळवण्यात यश आले. विजापूरमधील काही मित्रांनी पुढचे काम पार पाडले. रेशम आणि मेराजला त्यांनी हुबळी-वाराणसी एक्सप्रेसने बसवून दिले. त्या वाराणसीहून आपल्या गावी गेल्या. तेव्हढाच निरोप मिळाला पण पुढे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. या घटनेला काही वर्ष लोटली. रेशम आणि मेराज विस्मृतीत गेल्या...
मागच्या वर्षी ताजुद्दीन मरण पावल्याची बातमी कानावर आली या दोघींची आठवण झाली. ताजुद्दीनची खातेनिहाय चौकशी निघाली होती. बेनामी माया जमवणे, पदाचा गैरवापर करणे असे आरोप त्याच्यावर लावले होते. त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली. त्याची बरीचशी प्रॉपर्टी नातलगांनी बळकावली. त्याचे फार्म हाऊस आता उजाड झाले. नोकरीतून त्याला बडतर्फ केले गेले. त्याचे मानसिक संतुलन ढळण्याच्या बेतात आले. यामुळे त्याची प्रकृती ढासळत गेली आणि एका रात्री हृद्यविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. ताजुद्दीन भरल्या संसारातून उठला. कदाचित हा त्या दोन निष्पाप जीवांच्या तळतळाटाचा परिणाम तर नसावा असा विचार तत्क्षणी मनात तरळून गेला...
(या घटनेतील सर्व व्यक्ती आणि स्थळांची नावे बदलली असून, कुणावरही टीका करणे हा लेखनहेतू नाही. या व्यावसायातील स्त्रियांची व्यथा मांडणे हा हेतू आहे.)
संबंधित बातम्या
रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातलं न्यू इअर सेलिब्रेशन...
रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने (उत्तरार्ध)
रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने
पवित्र ...
रेड लाईट डायरीज : आज्जी आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स.... रेड लाईट डायरीज : रंगरुपाचे रेड-लाईट लॉजिक... रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातली नोटाबंदी रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व …… इंदिराजी …. काही आठवणी … रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई ….. रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट – 2 ‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे… नवरात्रीची साडी… रेड लाईट डायरीज – शांतव्वा…. रेड लाईट डायरीज – ‘धाड’! गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध) गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध) उतराई ऋणाची… स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव… गीता दत्त – शापित स्वरागिनीView More
ट्रेंडिंग न्यूज























