Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2024) देहू आणि आळंदी नागरी पुन्हा सज्ज झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. या रथाची संपूर्ण डागडुजी, चांदीचं पॉलिश करण्यात आलं आहे. सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास हा रथ करणार आहे. या चांदीच्या रथाची सर्व तपासणी करण्यात आली असून पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या रथाचे सर्व पार्टस, ब्रेक लायनर, रथ ओढण्याची क्षमता, रथातील लाईट, योग्य सर्व्हिसिंग केल्याची तपासणी करण्यात आली आहे. 


पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात


संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 29 जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आळंदीत देखील पालखी सोहळ्यासाठीची लगबग पाहायला मिळत आहे. आळंदीतील दुकानांमध्ये फुलांच्या माळा सजल्याचं दिसत आहे. तसेच तुळशीहार माळांनी देखील सर्व दुकानं फुलून गेली आहेत.


एका गावातून 40 पेक्षा अधिक भाविक असल्यास गावातून थेट एसटी


सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींसोबत चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.


सरकारचा मोठा निर्णय


यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत वारकरी संप्रदायाने केलं होतं. त्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  आता आषाढीच्या शासकीय महापूजेस 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडी प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने पुन्हा एकदा महायुतीत शिंदे शिवसेनेला मोठा फायदा मिळणार आहे.


वारकरी सांप्रदाय खुश


आता विठ्ठलाचा गाभारा आणि सोळखांबी मध्ये ही वाढलेली मानकऱ्यांची संख्या कशी मावणार हा प्रश्न देखील पडणार आहे. दरम्यान, शासनाने आषाढी वारीसाठी सोहळ्यात चालणाऱ्या सुमारे 1500 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचं राज्यातील दिंडी प्रमुखांनी स्वागत केलं.


हेही वाचा:


Ashadhi Wari 2024 : मोठी बातमी : यंदा आषाढी एकादशीला विठुरायाच्या महापूजेचा मान...; मुख्यमंत्र्यांचा पालख्यांबाबत मोठा निर्णय