Telangana Rashtra Samithi : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या धान खरेदी धोरणाविरोधात टीआरएस कडून आज दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. टीआरएसचे खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे टीआरएसतर्फे सांगण्यात आले आहे. रब्बी हंगामातील धान पिकाची हमीभावानं खरेदी करण्यासाठी टीआरएसकडून केंद्र सरकारविरोधात निषेध सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.


दरम्यान, पंजाब, हरियाणाप्रमाणेच तेलंगणामधील शेतकऱ्यांच्या संपूर्ण धान पिकाची खरेदी करण्यात यावी, अशी टीआरएसची मागणी आहे. त्यासाठी पक्षाने अनेकवेळा केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. तरीही केंद्र सरकारकडून रब्बीतल्या धान पिकाची खरेदी करायला नकार देत असल्याचे टीआरएसच्या नेत्यांनी सांगितले आहे. एकसमान धान खरेदी धोरणाचा आग्रह धरत तेलंगणातील सत्ताधारी टीआरएसने तीन एप्रिलपासून केंद्र सरकारविरोधात निषेध सप्ताह साजरा केला आहे. 


केंद्र सरकारच्या धान खरेदी धोरणात भेदभाव करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यातील धान खरेदी करण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्यानं सरकारच्या धोरणाविरोधात आज दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरुन लढा द्यावा लागेल अशा इशारा तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांनी दिला होता. त्याप्रमाणे आज टीआरएस आज आंदोलन करणार आहे. सरकारची धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप टीआरएसच्या नेत्यांनी केला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: