Lemon News : सध्या देशात आणि राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे लिंबाच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळं लिंबाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. देशातील आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रति किलोसाठी 120 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, उत्पादनात घट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सध्या लिंबू नसल्याने बाजारपेठेत लिंबाचा तुटवडा भासत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये लिंबू उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.


लिंबाच्या उत्पादनात यंदा घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. मजुरीचा खर्चही वाढला आहे. मात्र. गेल्या वर्षीच्या हंगामापेक्षा भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडे लिंबाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे जास्त शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात लिंबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. उन्हाळ्यात मागणीच्या दृष्टीने शेतकरी नियोजन देखील करत असतात. मात्र, यंदा उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नाही. किंमती वाढत असताना शेतकऱ्यांकडे मात्र, लिंबू शिल्लक दिसत नसल्याची स्थिती आहे.




मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लिंबाचे उत्पादन घटले असून, आवक कमी होत आहे. सध्या पुण्याच्या बाजारपेठेत सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यांतून लिंबाची आवक होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून लिंबाचे दर वाढले असून, शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळाल्याने ते खूष आहेत. अनेक वर्षांनी त्यांना चांगले दर मिळाले आहेत. सध्या बाजारपेठेत हिरव्या लिंबाचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्याने ते पिकण्यापूर्वीच लिंबाची तोडणी करीत आहेत. दरम्यान, जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर नव्या लिंबांचा हंगाम सुरु होईल. त्यावेळीच मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक होईल. मे महिन्यापर्यंत लिंबाचे दर तेजीत राहतील. सध्या मार्केट यार्डात लिंबाची होणारी आवक घटल्याने आणि उन्हाळ्यामुळे वाढलेली मागणी पाहता किरकोळ बाजारात एक लिंबू 8 ते 10 रुपयांना मिळत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: