(Source: Dainik Bhaskar)
TAUKTAE : पालघरला चक्रीवादळाचा मोठा फटका, किनाऱ्यावरील बोट उडाली, वादळी वाऱ्यामुळे उंचच उंच लाटा
रविवारी केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात तडाखा बसल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. वाटेत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही याचा परिणाम जाणवणार आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यायासह जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या. चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
भारतीय तटरक्षक दलाने गोवा कोस्ट येथून मिलाड नावाच्या फिशिंग बोटमधून 15 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका केली आहे. त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित असून सुरक्षेसाठी बोट किनाऱ्यावर आणली जात आहे.