Maharashtra Rain : राज्यभरात मुसळधार पाऊस, पाहा कुठे किती झालं नुकसान... ABP MAJHA
खरंतर, यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिकांचा आधीच चिखल झालाय. त्याततही आता अवकाळी पाऊस रब्बीच्या आणि दुबार पेरणी केलेल्या पिकांच्या मुळावर उठलाय. पालघर, अहमदनगर, पारनेर, महाबळेश्रर, वसई, नाशिक आणि सिन्नरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावलीय. आधीच कोरड्या दुष्काळाचं संकट असताना, आता अवकाळीनेही शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणलंय. ऐन पावसाळ्यात वरूणराजाने पाठ फिरवली, उभी पिकं करपून गेली आणि त्यांची माती झाली. त्यातूनही अनेक शेतकऱ्यांनी उसणवाऱ्या करून, कर्ज काढून दुबार पेरणी केली. त्या पिकांचे कोंब आता कुठे फुलू लागले होते, मात्र त्यावरही आता अवकाळीने वरवंटा फिरवलाय. आंबा, कापूस, तुरीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतही पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.





















