Virat Kohli's Big Announcement : भारतानं टी-20 विश्वचषक (IND vs SA, T20 World Cup 2024) जिंकला आणि कोट्ववधी भारतीयांचं स्वप्न साकार केलं आहे. भारत विश्वविजेता ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने अखेरच्या षटकात विजय मिळवला आहे. अंतिम सामन्याने कोहलीने विराट खेळी केली, ज्याची सर्वांनाच अपेक्षा होती. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विराटला चांगली खेळी करता आली नव्हती, पण अखेरच्या सामन्यात विराटने नावाला साजेशी अशी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने 76 धावांची शानदार खेळी केली. यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या सामन्यानंतर विराट कोहलीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.


'हा माझा अखेरचा T20 वर्ल्ड कप'


सामनावीर पुरस्कार स्वीकारताना विराट कोहली म्हणाला, ''हा माझा अखेरचा टी-२० विश्वचषक होता. टी20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार झाले आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला धावा काढताना झगडता. तुम्ही धावा घेऊ शकत नसल्याचं जाणवतं. मग गोष्टी घडतात, बदलतात.  देव महान आहे, ज्या दिवशी संघाला सर्वात जास्त गरज असते. त्यादिवशी संघासाठी माझ्या बॅटमधून धावा निघाल्या. हा माझा अखेरचा टी20 सामना  आहे.  अखेरच्या सामन्यात मला जास्त फायदा घ्यायचा होता. विश्वचषक उंचवायचा होता. आता पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे, काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि भारताचा झेंडा फडकवत ठेवतील.", असे विराट कोहली म्हणाला.


विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत






भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला


दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची खेळी खेळली, त्यानंतर गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये दमदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यापासून रोखलं. आफ्रिकेला शेवटच्या चार षटकात 26 धावांची गरज होती, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी तगडी गोलंदाजी करत संघाला 7 धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली आणि अक्षर पटेलनेही 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजांनी विजय निश्चित करण्यासाठी जिवाचं रान केलं आणि अखेर टीम इंडियाने टी20 विश्वकप उंचावला.