कशी असते 'महाराष्ट्र केसरी'ची गदा?
अभिजीत कटकेच्या तोलामोलाचा पैलवान आणि गतवेळच्या उपविजेत्या किरण भगतने पाठदुखी आणि कंबरदुखीच्या कारणास्तव महाराष्ट्र केसरीतून माघार घेतली आहे. पण किरण भगतच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र केसरी जिंकण्याचं आव्हान सोपं झालं, असं मानायची अभिजीतची तयारी नाही.
महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती ही माती आणि मॅट विभागांमधल्या विजेत्या पैलवानांमध्ये खेळवण्यात येत असते. किरण भगतला आजही मातीवरच्या कुस्तीत तोड नाही. पण त्याच्या अनुपस्थितीत मातीतून एखाद्या नव्या पैलवानाला किताबाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची संधी आहे. सोलापूरचा माऊली जमदाडे, बीडचा गोकुळ आवारे, जालन्याचा विलास डोईफोडे, पुणे शहरचा साईनाथ रानवडे, पुणे जिल्ह्याचा मुन्ना झुंझुरके आणि परभणीचा बाला रफिक शेख यांच्या मातीतल्या कामगिरीकडे कुस्तीतल्या जाणकारांची नजर राहील. अभिजीत कटकेचा समावेश असलेल्या मॅट विभागात पुण्याचा शिवराज राक्षे, बीडचा अक्षय शिंदे, कोल्हापूरचा कौतुक डाफळे, नाशिकचा हर्षद सदगीर, नगरचा विष्णू खोसे ही पैलवान मंडळीही यंदा चांगलीच तयारीत आहेत. अभिजीत कटकेला किताबाच्या फायनलमध्ये धडक मारण्याआधी कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने मराठवाड्यातल्या क्रीडारसिकांना तुफानी कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र केसरीच्या 62 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने जालन्यात तब्बल 49 वर्षांनी पुन्हा प्रतिष्ठेचा किताबाचा मानकरी कोण, याचा फैसला होणार आहे. याआधी 1969 साली हरिश्चंद्र बिराजदारांनी महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलं होतं. बिराजदार मामांकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्या मराठवाड्याचा एखादा पैलवान महाराष्ट्र केसरीत बाजी मारणार की, अभिजीत कटके पुन्हा महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरणार, याचा फैसला येत्या रविवारी होईल.