जम्मू-काश्मीर : जम्मूतील नगरोटा इथे झालेला हल्ला किती भ्याड होता, याची विदारक दृश्यं समोर आली आहेत. काही दहशतवाद्यांनी जवानांच्या घरावर बेछूट गोळीबार केला. मात्र, दोन सैनिकांच्या पत्नींनी दाखवलेल्या शौर्यामुळे दहशतवाद्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरलं.


शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले दहशतवादी पोलिसांच्या वेशात 16 हेडकॉर्प्सपासून सुमारे 3 किमी अंतरावरील आर्मी यूनिटमध्ये घुसले. त्यानंतर दहशतवाद्यांना सैनिकांच्या फॅमिली हेडक्वॉर्टरमध्ये घुसायचं होतं. जेणेकरुन ते सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवू शकतील.

मात्र, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन याच निवासस्थानात राहणाऱ्या दोन महिलांनी  निवाससथानाचं प्रवेशद्वार बंद केलं. इतकंच नाही तर दाराजवळ जड वस्तू लावून ठेवल्या. त्यामुळे दहशतवाद्यांना निवासस्थानात प्रवेश करता आला नाही आणि त्यांनी बाहेरुनच बेछूट गोळीबार सुरु केला.

दोन बाळांना घेऊन राहणाऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या प्रसंगावधनामुळे दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना यश आलं नाही. जर त्यांचा प्लॅन यशस्वी झाला असता तर नुकसान मोठं झालं असतं. दहशतवाद्यांनी लष्करी निवासात असलेल्या जवानांच्या कुटुंबियांना लक्ष्य केलं असतं किंवा त्यांना ओलीस ठेवलं असतं.

नगरोटातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे सात जवान शहीद



दहशतवादी दोन इमारतींमध्ये घुसले, ज्यात सैनिकांची कुटुंब राहतात. यानंतर कुटुंबीयांची सुटका करण्यासाठी सैनिकांनी तातडीने कारवाई करत, 12 सैनिक, दोन महिला आणि दोन बाळांना सुखरुप बाहेर काढलं. यातील एक बाळ 2 महिन्यांचं तर दुसं बाळ 18 महिन्यांचं आहे.

याच चकमकीमध्ये साऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पण या चकमकीत एका अधिकाऱ्यासह दोन जवान धारातीर्थी पडले.

दरम्यान चकमक संपल्यानंतर साऱ्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.