सारसांच्या लोककथा शोधणं जरा किचकट काम; कारण बगळा, करकोचा, क्रौंच इत्यादी काहीसे साधर्म्य असणाऱ्या पक्ष्यांना सरसकट सारस म्हणून टाकण्याची चुकीची पद्धत जगभर दिसते. मग गोष्टीत जर तपशील असतील, तर त्यावरून ओळख पक्की करता येते. उदा. बगळेराव अनेक बायका करतात; पण सारसबुवा मात्र जोडीदाराशी कमालीचे एकनिष्ठ असतात. इतके की, जोडीदाराचा मृत्यू झाला तर सारस आत्महत्या करतात अशा दंतकथा जगभर प्रचलित आहेत. दोघांची जोडी, त्यांत मादी वयाने लहान, त्यांची दोन-तीन पिल्लं आणि बाकी सतत सोबतीने व कळपाने वावरणं, राहणं असे हे एकत्र कुटुंब पद्धतीचे पाईक असलेले पक्षी. लांब सुंदर गुलाबी पाय, मानेच्या वरच्या भागात माणिकलाल मखमल, समुद्री हिरव्या रंगाची लांब टोकदार चोच, करडं डोकं, केशरी डोळे आणि मोतिया पिसांचा देखणा अंगरखा! सारस सतत एकमेकांत गुंतून राहणार, नृत्यं करणार, मादीभोवती कायम पिंगा घालणार, इकडून तिकडे उडाले तरी जोडीने उडतील – एकटे नाहीच. झाडांवर बसून राहणं यांना पक्षी असून आवडत नाही. पाण्यात, दलदलीत, जमिनीवर आनंदात किडे, गोगलगायी, सरडे, झुडुपांचे कोवळे अंकुर, गवताचे बी, धान्य खात फिरणार निवांत.
यांना असं निवांत पाहायचं असेल तर भारतात एक सुंदर जागा आहे. राजस्थानातल्या जोधपुर जिल्ह्यामधल्या फलौदी तालुक्यातलं खींचन नावाचं एक लहानसं गाव आहे. जुलै–सप्टेंबर सारसांचा विणीचा हंगाम असतो. सप्टेंबरमध्ये खींचनच्या वातावरणात केवळ सारसांचा कलरव ऐकू येत असतो, दुसरं काही नाही. राजस्थानमध्ये यांना कुरजां या नावाने ओळखलं जातं. ते थव्यांनी येतात, आधी दोन-तीन दिवस निव्वळ आकाशात चकरा मारत स्थळनिरीक्षण करतात. भरपूर अन्न आणि सुरक्षित वातावरण आहे, हे पाहून मगच खाली उतरतात. खींचनच्या लोकांनी त्यांच्यासाठी आता खास ‘चुग्गाघर’ देखील बनवलं आहे, तेही पर्यटकांचं आकर्षण बनलेलं आहे. बाजरीसोबत तिथं त्यांना मुग, छोटी बोरं आणि शेंगदाणे देखील खायला घातले जातात. सारस गावात राहत नाहीत, पण येऊन दाणे खाऊन पुन्हा आपल्या मुक्कामाला जातात. पक्के पाहुणे आहेत ते. खेरीज एकांतप्रिय आणि संकोची स्वभावाचेही.
राजस्थानमध्ये सारसांना उद्देशून गायलेली विरहिणीची शेकडो स्त्रीगीते ऐकण्यास मिळतात. किंबहुना परदेशी प्रियकर / पतीने लवकर परत यावे म्हणून गायल्या जाणाऱ्या लोकगीतांच्या प्रकाराला सारसाचंच नाव बहाल केलेलं आहे. राग, दु:ख, वैराग्य, शृंगार, प्रेम, तिरस्कार... कैक भावना, ज्या एरवी दडपून ठेवल्या जातात, त्या या गाण्यांमधून थेट मोकळेपणाने, खुल्या आवाजात नि:संकोचपणे, न लाजता, न अडखळता, न थबकता व्यक्त होतात. त्यात विरह तर आहेच, पण कारुण्यही आहे. मीलनाची आस आहे. राजस्थानातला कमी पाऊस तहान आणि तगमग अधिक वाढवणारा असतो, तेच सतत व्यापारासाठी घराबाहेर राहणाऱ्या पतीबाबत देखील घडतं, असं ती विरहिणी म्हणते. पहिली पावसाची सर आल्यापासून ते दिवाळीच्या सुमारास सारसदर्शन होईपर्यंत ही व्याकुळ गीतं गायली जातात.
कान्हा आणि खींचनखेरीज सारसांची अजून आठवण तामिळनाडूतली आहे. मदुराईच्या विमानतळावर उतरून प्रथम आम्ही मीनाक्षी मंदिरात गेलो होतो. तिथं एक पोत्रमरै कूलम म्हणजे सुवर्णकमळांचे तळे नावाचं पवित्र मानलं जाणारं सरोवर आहे. त्याची परिक्रमा करूनच मीनाक्षीचं दर्शन घेण्याची वाट मिळते. शंकराने हे सरोवर सारसांना बहाल केलं आणि यात बाकी कोणतेही जलचर निर्माण होणार नाहीत, राहणार नाहीत असं वरदान दिलं. सुवर्णकमळं आणि सारस असं देखणं लघुचित्र ही कथा ऐकताना डोळ्यांपुढे दिसत राहतं. या सरोवराची अजून एक कहाणी आहे. लेखक आपली साहित्यकृती त्या पाण्यावर ठेवतात. ती निकृष्ट दर्जाची असेल तर लगेच बुडते आणि उत्कृष्ट असेल तरच तरते, असं म्हणतात. या मंदिरात विवाहित स्त्रिया आपली मंगळसूत्रं खुद्द मीनाक्षीच्या मंगळसूत्रांशी बदलून घेतात आणि पतीचं आयुष्य त्यामुळे वाढवून मिळतं असं मानतात. या मीनाक्षीचं आणि सारसांचं काय नातं असेल, तेही एकदा शोधलं पाहिजे, असं ही कथा ऐकून वाटलं.
राजस्थानातल्या बाडमेर जिल्ह्यात ‘कुरंजा’ नावाचं एक गावच आहे; इतके सारस तिथं नेमानं येत. कोणे एके काळी इथं एक सुंदर तळं होतं. लोक गाणी गाऊन आणि दाणे खाऊ घालून सारसांचं स्वागत करायचे. पुढे इथं माणसं आणि माणसांची घरं इतकी वाढली की तळं केवळ दंतकथेच्या रुपात शिल्लक उरलं आणि सारसांचं येणंही बंद झालं. राजस्थानातल्या ज्या बाकीच्या हक्काच्या जागा आहेत सारसांच्या, तिथंही कधी सलग तीन-चार वर्षं दुष्काळ पडला की सारस दृष्टीस पडणं अशक्यच! मग जे गीत सारसाला उद्देशून प्रियकरासाठी गायचं, ते प्रियकराला उद्देशून सारसासाठी गाण्याची वेळ येणारच!
सूती थी रंग महल में, सूती ने आयो रे जंजाळ,
सुपना रे बैरी झूठो क्यों आयो रे
कुरजां तू म्हारी बैनडी ए, सांभळ म्हारी बात,
ढोला तणे ओळमां भेजूं थारे लार।
कुरजां ए म्हारो भंवर मिला देनी ए।