कान्हा अभयारण्यात मी पहिल्यांदा संध्याकाळी सारस पाहिले होते, ते दृश्य डोळ्यांपुढे तरळतंय. वाघांचं दर्शन झालं की जंगलात अजून काही पाहण्याचं शिल्लक नसतं, असा समज असणारे लोक परतले होते. हिरव्या रंगाने डोळे शिणले म्हणून पाणवठ्याचा निळा दिसताच आम्ही जीप थांबवून पाहत थांबलो. उगीच थांबलो म्हणत गाईड वैतागून डोळे मिटून लुंढकला आणि अवचित मला आकाशातून पाण्यावर हलकेच पंख लहरवत उतरणारे दोन मोठ्या आकाराचे काळसर पक्षी दिसले. मी दुर्बिणीतून पाहिलं, तर ते सारसाचं जोडपं होतं. आणि मोतिया पिसांचा अंगरखा. काळोखाआधी ती जोडी तळ्यावर उतरत होती... दूरवरून मोठा प्रवास करून आलेली. गाईड खडबडून जागा झाला... यंदाची सारसांच्या आगमनाची पहिली बातमी तो बाकीच्यांना देणार होता.


सारसांच्या लोककथा शोधणं जरा किचकट काम; कारण बगळा, करकोचा, क्रौंच इत्यादी काहीसे साधर्म्य असणाऱ्या पक्ष्यांना सरसकट सारस म्हणून टाकण्याची चुकीची पद्धत जगभर दिसते. मग गोष्टीत जर तपशील असतील, तर त्यावरून ओळख पक्की करता येते. उदा. बगळेराव अनेक बायका करतात; पण सारसबुवा मात्र जोडीदाराशी कमालीचे एकनिष्ठ असतात. इतके की, जोडीदाराचा मृत्यू झाला तर सारस आत्महत्या करतात अशा दंतकथा जगभर प्रचलित आहेत. दोघांची जोडी, त्यांत मादी वयाने लहान, त्यांची दोन-तीन पिल्लं आणि बाकी सतत सोबतीने व   कळपाने वावरणं, राहणं असे हे एकत्र कुटुंब पद्धतीचे पाईक असलेले पक्षी. लांब सुंदर गुलाबी पाय, मानेच्या वरच्या भागात माणिकलाल मखमल, समुद्री हिरव्या रंगाची लांब टोकदार चोच, करडं डोकं, केशरी डोळे आणि मोतिया पिसांचा देखणा अंगरखा! सारस सतत एकमेकांत गुंतून राहणार, नृत्यं करणार, मादीभोवती कायम पिंगा घालणार, इकडून तिकडे उडाले तरी जोडीने उडतील – एकटे नाहीच. झाडांवर बसून राहणं यांना पक्षी असून आवडत नाही. पाण्यात, दलदलीत, जमिनीवर आनंदात किडे, गोगलगायी, सरडे, झुडुपांचे कोवळे अंकुर, गवताचे बी, धान्य खात फिरणार निवांत.



यांना असं निवांत पाहायचं असेल तर भारतात एक सुंदर जागा आहे. राजस्थानातल्या जोधपुर जिल्ह्यामधल्या फलौदी तालुक्यातलं खींचन नावाचं एक लहानसं गाव आहे. जुलै–सप्टेंबर सारसांचा विणीचा हंगाम असतो. सप्टेंबरमध्ये खींचनच्या वातावरणात केवळ सारसांचा कलरव ऐकू येत असतो, दुसरं काही नाही. राजस्थानमध्ये यांना कुरजां या नावाने ओळखलं जातं. ते थव्यांनी येतात, आधी दोन-तीन दिवस निव्वळ आकाशात चकरा मारत स्थळनिरीक्षण करतात. भरपूर अन्न आणि सुरक्षित वातावरण आहे, हे पाहून मगच खाली उतरतात. खींचनच्या लोकांनी त्यांच्यासाठी आता खास ‘चुग्गाघर’ देखील बनवलं आहे, तेही पर्यटकांचं आकर्षण बनलेलं आहे. बाजरीसोबत तिथं त्यांना मुग, छोटी बोरं आणि शेंगदाणे देखील खायला घातले जातात.  सारस गावात राहत नाहीत, पण येऊन दाणे खाऊन पुन्हा आपल्या मुक्कामाला जातात. पक्के पाहुणे आहेत ते. खेरीज एकांतप्रिय आणि संकोची स्वभावाचेही.

राजस्थानमध्ये सारसांना उद्देशून गायलेली विरहिणीची शेकडो स्त्रीगीते ऐकण्यास मिळतात. किंबहुना परदेशी प्रियकर / पतीने लवकर परत यावे म्हणून गायल्या जाणाऱ्या लोकगीतांच्या प्रकाराला सारसाचंच नाव बहाल केलेलं आहे. राग, दु:ख, वैराग्य, शृंगार, प्रेम, तिरस्कार... कैक भावना, ज्या एरवी दडपून ठेवल्या जातात, त्या या गाण्यांमधून थेट मोकळेपणाने, खुल्या आवाजात नि:संकोचपणे, न लाजता, न अडखळता, न थबकता व्यक्त होतात. त्यात विरह तर आहेच, पण कारुण्यही आहे. मीलनाची आस आहे. राजस्थानातला कमी पाऊस तहान आणि तगमग अधिक वाढवणारा असतो, तेच सतत व्यापारासाठी घराबाहेर राहणाऱ्या पतीबाबत देखील घडतं, असं ती विरहिणी म्हणते. पहिली पावसाची सर आल्यापासून ते दिवाळीच्या सुमारास सारसदर्शन होईपर्यंत ही व्याकुळ गीतं गायली जातात.

सारसांच्या प्रणयनृत्याचं वर्णन मी माझ्या ‘कुहू’ या कादंबरीत केलेलं आहे... “ रात्री इथं सारसांनी रिंगण केलं आणि हलकेच नृत्याला सुरुवात केली. एक लांबटांग्या सारस अगदी मस्त तोऱ्यात रिंगणात उतरला. बघता बघता बाकी सगळ्यांवर मात करत त्यानं मादीला खुलवलं, फुलवलं. मानांमध्ये चोची खुपसत, पिसं फुलवत, नृत्य करत ती दोघं अशी काही एकमेकांमध्ये गुंतली, मग्न झाली, मिसळली... अरे, आभाळात शुक्रतारा केव्हा उगवला हे देखील कळलं नाही मला...!”

कान्हा आणि खींचनखेरीज सारसांची अजून आठवण तामिळनाडूतली आहे. मदुराईच्या विमानतळावर उतरून प्रथम आम्ही मीनाक्षी मंदिरात गेलो होतो. तिथं एक पोत्रमरै कूलम म्हणजे सुवर्णकमळांचे तळे नावाचं पवित्र मानलं जाणारं सरोवर आहे. त्याची परिक्रमा करूनच मीनाक्षीचं दर्शन घेण्याची वाट मिळते. शंकराने हे सरोवर सारसांना बहाल केलं आणि यात बाकी कोणतेही जलचर निर्माण होणार नाहीत, राहणार नाहीत असं वरदान दिलं. सुवर्णकमळं आणि सारस असं देखणं लघुचित्र ही कथा ऐकताना डोळ्यांपुढे दिसत राहतं. या सरोवराची अजून एक कहाणी आहे. लेखक आपली साहित्यकृती त्या पाण्यावर ठेवतात. ती निकृष्ट दर्जाची असेल तर लगेच बुडते आणि उत्कृष्ट असेल तरच तरते, असं म्हणतात. या मंदिरात विवाहित स्त्रिया आपली मंगळसूत्रं खुद्द मीनाक्षीच्या मंगळसूत्रांशी बदलून घेतात आणि पतीचं आयुष्य त्यामुळे वाढवून मिळतं असं मानतात. या मीनाक्षीचं आणि सारसांचं काय नातं असेल, तेही एकदा शोधलं पाहिजे, असं ही कथा ऐकून वाटलं.

राजस्थानातल्या बाडमेर जिल्ह्यात ‘कुरंजा’ नावाचं एक गावच आहे; इतके सारस तिथं नेमानं येत. कोणे एके काळी इथं एक सुंदर तळं होतं. लोक गाणी गाऊन आणि दाणे खाऊ घालून सारसांचं स्वागत करायचे. पुढे इथं माणसं आणि माणसांची घरं इतकी वाढली की तळं केवळ दंतकथेच्या रुपात शिल्लक उरलं आणि सारसांचं येणंही बंद झालं. राजस्थानातल्या ज्या बाकीच्या हक्काच्या जागा आहेत सारसांच्या, तिथंही कधी सलग तीन-चार वर्षं दुष्काळ पडला की सारस दृष्टीस पडणं अशक्यच! मग जे गीत सारसाला उद्देशून प्रियकरासाठी गायचं, ते प्रियकराला उद्देशून सारसासाठी गाण्याची वेळ येणारच!

सूती थी रंग महल में,  सूती ने आयो रे जंजाळ,

सुपना रे बैरी झूठो क्यों आयो रे

कुरजां तू म्हारी बैनडी ए, सांभळ म्हारी बात,

ढोला तणे ओळमां भेजूं थारे लार।

कुरजां ए म्हारो भंवर मिला देनी ए।

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई