TATA IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना क्रिकेट चाहत्यांना निराश करणारी माहिती समोर आलीय. चीन, दक्षिण कोरियासह युरोपियन देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रालाही सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र सरकारनं याआधी 25 टक्के प्रेक्षकांसह आयपीएलच्या लढती खेळण्यास परवानगी दिली होती. पण येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास राज्य सरकारकडून परवानगी रद्द केली जाऊ शकते. यामुळं आयपीएलचा पुढचा हंगामाही प्रेक्षकांविना खेळला जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यंदा आयपीएलमधील सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत.


चीन आणि कोरिया यांसह अनेक देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागलीय. ज्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगावर चिंताचे वातावरण निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्राला पुढील धोक्याबाबत अलर्ट केलंय. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षक येत असतात. यामुळं कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी यंदाही आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 


आयपीएलच्या आगामी पंधराव्या मोसमासाठी बीसीसीआय सज्ज झालंय. येत्या 26 मार्च ते 29 मे या कालावधीत आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या मोसमातल्या 74 पैकी 70 साखळी सामन्यांचं आयोजन मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमापासून आठऐवजी दहा संघ खेळणार आहेत. या दहा संघांची 'अ' आणि 'ब' अशा गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातल्या संघांसोबत एकेक सामना आणि दुसऱ्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. त्यामुळं संघांची संख्या वाढली असली तरी सामन्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसून येत आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha