कोलकाता : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल 31 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders ) अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं. राजस्थान रॉयल्सनं दोन विकेटनं विजय मिळवला. राजस्थानच्या डावाच्या 16 व्या ओव्हरपर्यंत मॅच कोलकाताच्या हातात होती. मात्र,  जोस बटलर आणि रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीमुळं मॅच कोलकाताच्या हातून निसटली. या पराभवानंतर कोलकाताच्या टीममध्ये निराशेचं वातावरण दिसून आलं. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान (Shahrukh Khan)  यानं पराभवानंतर निराश झालेल्या खेळाडूंपुढं भाषण करुन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. या भाषणाचा व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्सनं शेअर केला आहे. 


कोलकाता नाईट रायडर्डसनं सुनील नरेनच्या शतकी खेळीच्या जोरावर 6 बाद 223 धावा केल्या होत्या. सुनील नरेननं 109 धावांची खेळी केली होती.  यानंतर 223 धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानला कोलकाताच्या बॉलर्सनी धक्के दिले होते. राजस्थानच्या डावाच्या 16 व्या ओव्हरपर्यंत मॅच केकेआरच्या हातात होती. रोव्हमन पॉवेल आणि जोस बटलरनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थाननं मॅच जिंकली. या पराभवामुळं कोलकाताचे खेळाडू निराश झाल्याचं पाहायला मिळत होतं.  


कोलकाता नाईट रायडर्सचा संघमालक शाहरुख खान यानं पराभवानंतर खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. शाहरुख खाननं केकेआरच्या ड्रेसिंग रुमध्ये खेळाडूंशी संवाद साधला. शाहरुख खान म्हणाला की जीवनात काही दिवस असे असतात, प्रामुख्यानं  खेळामध्ये एखाद्या दिवशी आपण पराभवास पात्र नसतो आणि काही दिवशी आपण विजयासाठी पात्र नसतो पण गोष्टी बदलत असतात.  


पाहा व्हिडीओ :






शाहरुख खान पुढं म्हणाला की, आज आपण पराभवस पात्र नव्हतो, आपण सर्व जण चांगलं खेळलो होते. आपल्या सर्वांना कामगिरीबद्दल अभिमान वाटला पाहिजे. कुणीही निराश होऊ नका, दु:खी राहू नका, आनंदी राहा, जेव्हा आपण चेंजिंग रुममध्ये येतो त्यावेळी आपलं मनोधैर्य उंचावलेलं असलं पाहिजे असं शाहरुख खान म्हणाला. 


शाहरुख खान पुढे म्हणालाकी, मुख्य गोष्ट आपल्या सर्व खेळाडूंमध्ये असलेली ऊर्जा आहे. आपण ग्राऊंडवर चांगली ऊर्जा दाखवली होती. वैयक्तिकरित्या सर्वांचं एकमेकांशी चांगलं बाँडिंग झालंय, हे असंच सुरु ठेवा, असं आवाहन शाहरुख खाननं केलं. तो पुढे म्हणाला की प्रामाणिकपणे सांगतो, आजचा दिवस अभिमान वाटण्यासारखा आहे.आपण चांगलं खेळलो,मी कुणाचंही नाव घेत नाही, गौतम गंभीर तू देखील निराश राहू नको आपण पलटवार करु, असं शाहरुख खान म्हणाला. देवाच्या कृपेनं आपण चांगल्या कामगिरीसह पलटवार करु, अस शाहरुख खाननं म्हटलं.  


संबंधित बातम्या : 


 'आवेश द फिनिशर', राजस्थानच्या विजयात अनोखी कामगिरी, लखनौकडून आवेश खानसाठी भन्नाट ट्विट


 RR vs KKR : मॅच जिंकणार हा आत्मविश्वास कुणी दिला? शतकवीर जोस बटलर नव्हे, संजू सॅमसननं घेतलं दुसऱ्या खेळाडूचं नाव...