IPL 2024 RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 47 धावांनी पराभव करून IPL 2024 च्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बंगळुरुने प्रथम खेळताना 187 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये रजत पाटीदारच्या 52 धावांच्या अर्धशतकाचे महत्त्वपूर्ण योगदान होते. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला केवळ 140 धावा करता आल्या. बंगळुरुच्या या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे. बंगळुरुने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे, तर दिल्लीची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.


बंगळुरुविरुद्धच्या आजच्या सामन्यात ऋषभ पंत खेळत नव्हता, त्यामुळे अक्षर पटेलने कर्णधाराची भूमिका निभावली. दिल्लीसाठी अक्षरने सर्वाधिक धावा केल्या, ज्याने 39 चेंडूत 57 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली, मात्र अक्षर पटेलने कर्णधारपदाची खेळी खेळली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. दिल्लीने नेमकी कुठे चूक केली, याबाबत अक्षर पटेलने सामना झाल्यानंतर बोलताना सांगितले. 


अक्षर पटेल काय म्हणाला?


दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, पहिल्या 6 षटकांत 4 विकेट्स गमावल्यानंतर पुढे नक्कीच संघर्ष करावा लागतो. या खेळपट्टीवर 160-170 चांगली धावसंख्या होती. काही चेंडू उसळी घेत जोरात बॅटवर येत होता, तर काही चेंडू थांबून बॅटवर येत होता. जर तुमचा प्रमुख फलंदाज धावबाद होऊन माघारी परतल्यास आणि त्यानंतर आणखी 3 विकेट्स गमावल्यास अडचणी वाढणं सहाजिकच होतं. 


दिल्लीसाठी प्ले ऑफचं समीकरण काय?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सने 13 सामन्यात एकूण 12 गुण आहेत. सध्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा पुढील आणि या हंगामातील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत होणार आहे. 14 मे रोजी दिल्ली आणि लखनौचा संघ आमने सामने येतील. या सामन्यात दिल्लीने लखनौचा पराभव केल्यास दिल्लीचे 14 गुण होतील. मात्र यानंतर प्ले ऑफच्या फेरीत जाण्यासाठी दुसऱ्या संघावर अवलंबून रहावे लागणार आहे. 


कसा रंगला सामना? 


188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 30 धावांत 4 विकेट गमावल्या. असे असतानाही पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 4 गडी गमावून संघाने 50 धावांचा टप्पा पार केला. अशा स्थितीत शाई होप आणि अक्षर पटेल यांच्यात 56 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पण 10व्या षटकात लॉकी फर्ग्युसनने शाई होपला 29 धावांवर बाद केले. 11व्या षटकात केवळ 3 धावा काढून ट्रिस्टन स्टब्स बाद झाला. आता संघाकडे एकही फलंदाज उरला नव्हता. 15व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 10 धावा करून रसिक दार सलाम पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या 5 षटकात 61 धावा करायच्या होत्या. 16व्या षटकात यश दयालने अक्षर पटेलला 57 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यामुळे बेंगळुरूचा विजय जवळपास निश्चित झाला. दिल्लीने 18 षटकापर्यंत 135 धावा केल्या होत्या, पण फक्त एक विकेट शिल्लक होती. शेवटच्या षटकात 48 धावा करणे अशक्य होते. दिल्ली 140 धावांवर सर्वबाद झाली, त्यामुळे आरसीबीने हा सामना 47 धावांनी जिंकला.


संबंधित बातम्या:


Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video


IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!


चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's