IPL 2023, KKR vs RCB : कोलकात्याचा संघ अडचणीत सापडला तेव्हा लॉर्ड शार्दुल ठाकूर संकटमोचक म्हणून धावून आला. शार्दुल ठाकूर याने 68 धावांची विस्फोटक खेळी केली. शार्दुल ठाकूर याने रिंकू सिंह याला जोडीला घेत कोलकात्याची धावसंख्या 204 पर्यंत पोहचली.  आंद्रे रसेल बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण लॉर्ड शार्दुल ठाकूर याने आंद्रे रसेलच्या स्टाईलने फटकेबाजी केली. 


शार्दुलचा फिनिशिंग टच - 


आंद्रे रसेल बाद झाल्यानंतर लॉर्ड शार्दुल ठाकूर मैदानात आला. कोलकात्याचा संघ अडचणीत होता. रसेलने निराश केल्यानंतर शार्दुल ठाकूर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शार्दुल ठाकूर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. शार्दुलने मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावले. शार्दुल ठाकरू याने 29 चेंडूत 68 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान शार्दुल ठाकूर याने तीन षटकार आणि 9 चौकार लगावले. शार्दुलच्या विस्फोटक खेळीमुळे कोलकाता संघाने 200 धावांचा पल्ला ओलांडला. 


रिंकूची चांगली साथ - 


शार्दूल ठाकूर याने आक्रमक रुप धारण करत धावांचा पाऊस पाडला. मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावत असलेल्या शार्दूल ठाकूरला रिंकूने चांगली साथ दिली. रिंकूने 33 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. अखेरच्या षटकात धावा चोपण्याच्या नादात रिंकू सिंह बाद झाला. 


रिंकू-शार्दुलची निर्णायक शतकी भागिदारी - 


कोलकात्याचा अर्धा संघ 90 धावांच्या आत तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी दमदार फलंदाजी केली. शार्दुल ठाकूर याने धावांचा पाऊस पाडला तर रिंकूने शार्दुल याला चांगली साथ दिली. दोघांनी धावांचा पाऊस पाडत शतकी भागिदारी केली. केकेआर 150 धावांपर्यंत जाईल की नाही, यात साशंकता होती. पण शार्दुल आणि रिंकू यांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकाताने 200 धावांचा पल्ला पार केला. रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी 47 चेंडूत 103 धावांची भागिदारी केली. शार्दूल आणि रिंकू यांच्या भागिदारीमुळे कोलकात्याने दमदार पुनरागमन केले. 


दिग्गजांचा फ्लॉप शो - 
आरसीबीच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. वेंकटेश अय्यर, मनदीप सिंह, कर्णधार नितीश राणा, आंद्रे रसेल यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. वेंकटेश अय्यर 3 आणि नितीश राणा 7 धावा काढून बाद झाले. तर विस्फोटक आंद्रे रसेल आणि मनदीप सिंह यांना खातेही उघडता आले नाही. दिग्गज फलंदाज बाद झाल्यामुळे कोलकात्याचा संघ अडचणीत सापडला होता. पण शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी दमदार भागिदारी करत कोलकात्याचा डाव सावरला.