IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या सीझन 13च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सनी पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चषक उंचावला आहे. पण विजयी झाल्यानंतरही मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरला तो म्हणजे, कोरोना. या वर्षी विजयी झालेल्या मुंबई इंडियन्सला बक्षिसाची रक्कम केवळ दहा कोटी रुपयेच मिळाली. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 6.25 कोटी रूपयांची बक्षिसी रक्कम जिंकण्यात यशस्वी राहिला.


आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा संघ होता. तर विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चौथ्या क्रमांकावर होता. या दोन्ही संघाना प्रत्येकी 5 कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम देण्यात आली.





मुंबईला का भोगावं लागलं नुकसान?


संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात आयपीएल 2020 भारतात न खेळवता, दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदा बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. कोविड-19 मुळे आधीच आयपीएल 6 महिने उशिरा खेळवण्यात आली. तसेच आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आले. त्यामुळे आयपीएलमधून होणारी कमाई अत्यंत कमी झाली.





याव्यतिरिक्त भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सीमावादानंतर चिनी कंपनी विवोकडून आयपीएलचं टायटल सॉन्सर काढून घेण्यात आलं. बीसीसीआयला ड्रीम इलेव्हनच्या स्वरुपात आयपीएलसाठी नवा टायटल स्पॉन्सर मिळाला. परंतु, विवोसाठी 450 कोटी रुपये वर्षाकाठी देत होती. या तुलनेत ड्रीम इलेव्हनने बीसीसीआयला एका सीझनसाठी केवळ 200 कोटी रुपयेच दिले.


दरम्यान, या सर्व कारणांमुळे एकूणच बीसीसीआयला मोठं नुकसान झालं. त्यामुळेच बीसीसीआयच्या वतीने यावर्षीच्या बक्षिसाच्या रक्कमेत 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. याआधी आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये दिले जात होते. तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटी, तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी 10 कोटी रुपये देण्यात येतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


IPL 2020 Final, MIvsDC : दिल्लीचं आयपीएल विजेता होण्याचं स्वप्न भंगलं! मुंबईने पाचव्यांदा उंचावला IPL चषक