Harbhajan Singh on Hardik Pandya : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अवस्था अतिशय दयनीय झाली. साखळी फेरीतच (IPL 2024) मुंबईचे आव्हान संपुष्टात आले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला 14 पैकी फक्त चार सामने जिंकता आले. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स दहाव्या क्रमांकावर राहिला. आयपीएल 2024 आधी मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून ट्रेंड केले, त्यानंतर रोहित शर्माची हाकलपट्टी करुन त्याला कर्णधार केले. आयपीएल स्पर्धेदरम्यान चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केले. मुंबईच्या दैयनीय स्थितीला हार्दिक पांड्या जबाबदार असल्याचे अनेक चाहत्यांनी मत व्यक्त केले. पण मुंबईचा माजी खेळाडू हरभजन सिंह (Harbhajan Singh) यानं मुंबईच्या या स्थितीला हार्दिक पांड्या जबाबदार नसल्याचे म्हटलेय. मुंबईच्या खराब स्थितीसाठी सिनियर खेळाडू जबाबदार असल्याचं भज्जी म्हणाला. हरभजन सिंह याने रोहित शर्माचे थेट नाव घेतले नाही, पण रोख तिकडेच होता. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये उभी फूट पडल्याचे अनेकदा समोर आले होते. अनेक माजी खेळाडूंनीही तसा दावा केला होता. आता हरभजन सिंह याच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. 


हरभजन सिंह काय म्हणाला ?


मी मुंबई इंडियन्ससोबत मी 10 वर्षे खेळलो आहे.  येथील संघ व्यवस्थापन उत्तम आहे, पण हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय फसला.   हार्दिक पांड्याला कर्णधार बनवताना व्यवस्थापन भविष्याचा विचार करत होते, पण  ते जमलं नाही.   जेव्हा संघ खेळत होता, तेव्हा असे वाटत होते की जणू कॅप्टन वेगळा खेळत आहे आणि संपूर्ण संघ वेगळा आहे. मला वाटते (पंड्याला कर्णधार बनवण्याची) वेळ योग्य नव्हती. कदाचित हे वर्षभरानंतर करता आले असते. गुजरात टायटन्सचा कर्णधार असल्यामुळे हार्दिक पांड्याचा यात दोष नाही. संघ एकत्रितपणे खेळला नाही आणि संघ एकसंध कधीच वाटला नाही. कर्णधार वेगळा आणि केळाडू वेगळे वाटत होते. मोठ्या संघाची अशी अवस्था पाहून वाईट वाटले. मी त्या संघाचा सदस्य राहिलोय. संघात दिग्गज खेळाडू असताना अशी अवस्था झाल्यामुळे वाईट वाटलं. हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय योग्यवेळी घेतला असं वाटत नाही. मॅनेजमेंटने हा निर्णय घेतल्यानंतर संघ एकसंध खेळला नाही. यावेळी वरिष्ठ खेळाडूंचा रोल महत्वाचा ठरतो, ते दिसलं नाही. मुंबई इंडियन्स एकसंघासारखा खेळली नाही. 






 हार्दिक पांड्याची काहीच चूक नाही - भज्जी 


मुंबईचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने स्पष्ट मत व्यक्त केले. मुंबईच्या खराब प्रदर्शनात हार्दिक पांड्याची काहीच चूक नाही. हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय चुकीच्या वेळी घेतला गेला. जर वर्षभरानंतर हार्दिक पांड्याला कर्णधार केले असतं, तर परिस्थिती वेगळी असती. गुजरातमध्ये हार्दिक पांड्या चांगले नेतृत्व करतच होता. मुंबईची खराब स्थिती झाली, त्यात हार्दिक पांड्याची काहीच चूक नाही. आशावेळी सिनियर खेळाडूंची जबाबदारी वाढते, पण त्यांच्याकडून एकसंध टीम होण्याची काहीच झाले नाही. कर्णधार कुणीही असो, टीम सर्वात आधी. कर्णधार येतात जातात पण संघ तिथेच असतो, असे भज्जी म्हणाला. 






मुंबईचा संघ दोन गटात विभागला ?


आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने अतिशय बोल्ड निर्णय घेतला.   पाच वेळच्या आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली. मुंबईने हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं, खरं पण त्याला प्रभाव पाडता आला नाही. अंतर्गत आणि बाहेरील दबावात हार्दिकला चोख कामगिरी करता आली नाही. मुंबईचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. दुसरीकडे मुंबईचा ताफा दोन गटात विभागल्याच्या बातम्याही धडकल्या. भारतीय खेळाडू रोहित शर्माच्या बाजूने तर विदेशी खेळाडू हार्दिकच्या बाजूने असल्याच्या बातम्याही आल्या. इतकेच नाही तर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यासारख्या खेळाडूंनी हार्दिक पांड्याच्या स्वभावाची तक्रार टीम मॅनेजमेंटकडे केल्याच्या चर्चेनेही जोर धरला. रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार, ही चर्चा सुरु आहे.