डब्लिन : डब्लिनच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताने यजमान आयर्लंडचा 143 धावांनी धुव्वा उडवला. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या इतिहासात हा आजवरचा दुसरा मोठा विजय ठरला. भारताच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येच्या फरकाने जिंकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.


यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकीच्या जोरावर टीम इंडियाला ही मजल मारता आली. या विजयासह भारतानं ही मालिका 2-0 अशी निर्विवादपणे खिशात घातली.

टीम इंडियानं दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव अवघ्या 70 धावांत संपुष्टात आला. भारताकडून कुलदीप यादवनं 16 धावांत तीन आणि यजुवेंद्र चहलनं 21 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. याशिवाय उमेश यादवनं दोन तर सिद्धार्थ कौल आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली.

सलामीवीर लोकेश राहुल आणि सुरेश रैनाच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं आयर्लंडसमोर 213 धावांचा डोंगर उभारला. शिखर धवनच्या जागी संधी मिळवलेल्या लोकेश राहुलनं 36 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकार ठोकत 70 धावांची खेळी केली.

रैनाने 45 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 69 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे टीम इंडियाला 20 षटकांत चार बाद 213 धावांची मजल मारता आली. कर्णधार विराट कोहली मात्र या सामन्यात केवळ 9 धावा काढून माघारी परतला.
पहिल्या टी-20 मध्ये आयर्लंडचा धुव्वा, भारताचा 76 धावांनी विजय

भारताच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येच्या फरकाने जिंकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वी 2017 साली कटकमध्ये भारताने श्रीलंकेवर 93 धावांनी विजय मिळवला होता.

आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या इतिहासात हा आजवरचा दुसरा (विभागून) मोठा विजय ठरला. याच वर्षी कराचीत झालेल्या टी20 सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिज 143 धावांनी धुव्वा उडवला होता. 2007 मध्ये श्रीलंकेने केनियावर 172 धावांनी मिळवलेला विजय हा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय आहे.