विशाखापट्टणम : विशाखापट्टणम कसोटीमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय धमाकेदार विजय मिळवला आहे. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांच्या प्रभावी माऱ्यापुढे दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 191 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच तर जाडेजाने चार विकेट्स घेत आफ्रिकेचा डाव गुंडाळला.


दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरेलेल्या आफ्रिका संघाला सुरुवातीपासूनच सावरता आले नाही.  आफ्रिकेकडून तळाचा फलंदाज  डेन पिडीटने टिच्चून फलंदाजी करत 56  धावा केल्या तर मुथुस्वामी 49 धावांवर नाबाद राहिला. हे दोघे वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर  तग धरु शकला नाही.

रोहित शर्माच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 395 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याआधी टीम इंडियानं आपला दुसरा डाव चार बाद 323 धावांवर घोषित केला होता. सलामीच्या रोहित शर्मानं दुसऱ्या डावातंही शानदार शतक झळकावलं होतं. त्याचं कसोटी कारकीर्दीतलं हे पाचवं शतक ठरलं. तर चेतेश्वर पुजारानं 81 धावांची खेळी उभारली होती.

आर. अश्विनची 'वेगवान' कामगिरी, मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी

चौथ्या दिवशी आफ्रिकेचा पहिल्या डावातील शतकवीर डीन एल्गरला पायचीत पकडत आफ्रिकेला पहिला धक्का दिला होता. डे-ब्रूनला बाद करत आश्विनने अखेरच्या दिवशी भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर मोहम्मद शमीने बावुमाचा शून्यावर त्रिफळा उडवला. यानंतर कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि एडन मार्क्रम यांनी छोटेखानी भागीदारी करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद शमीने कर्णधार डु-प्लेसिसला बाद करत पुन्हा धक्का दिला.

यानंतर क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, केशव महाराज हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. पिडीट आणि मुथुस्वामी यांनी अखेरच्या षटकांमध्ये भागीदारी रचत भारताचा विजय लांबणीवर टाकला. अखेर रबाडाला यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हातून झेलबाद करत शमीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.