लखनऊ : भारताने बेल्जियमचा 2-1 असा धुव्वा उडवून तब्बल पंधरा वर्षांनंतर ज्युनियर हॉकी विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय.


लखनऊच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात गुरजंतसिंगने आठव्याच मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं होतं. मग सिमरनजीत सिंगने 22 व्या मिनिटाला भारतासाठी दुसरा गोल झळकावला.

भारताने याआधी 2001 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकावर नाव कोरलं होतं. भारताने उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. त्याआधी भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा काटा काढला होता. तर साखळी फेरीत भारताने कॅनडा, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं.