मुंबईसाठी 40 हजार कोटींचे प्रकल्प तयार करणार : सुरेश प्रभू
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2016 03:33 PM (IST)
मुंबई : येत्या वर्षभरात फक्त मुंबईसाठी 40 हजार कोटींचे प्रकल्प तयार करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. तसंच काही वर्षातच ते सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेऊ अशी घोषणाही त्यांनी केली आहे. मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या विविध सेवांचं लोकार्पण आज सुरेश प्रभूंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुरेश प्रभुंनी ही घोषणा केली आहे. तसंच खुद्द पंतप्रधान लवकरच अनेक योजनांची घोषणा करणार असल्याचं प्रभूंनी म्हटलं आहे. मुंबईसह 100 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवाही देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं. आजपासून दिवा स्टेशनवरही फास्ट लोकलचा थांबा सुरु करण्यात आला आहे. याचं लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केलं.