लंडन : ऐन विश्वचषकातच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल. धवनच्या जागी आता केएल राहुल किंवा रिषभ पंत टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करु शकतो.


शिखर धवन आता तीन आठवड्यांपर्यंत एकही सामना खेळू शकणार नाही. याचा अर्थ असा की 13 जून रोजी न्यूझीलंड आणि 16 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यांआधी टीम इंडियासाठी हा मोठा झटका आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडून धवनच्या अंगठ्याला लागला. अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं. नॉटिंग्घममध्ये आज झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

शिखर धवनने आयसीसी टूर्नामेंट्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. शिखर धवनने 2015 च्या विश्वचषकात 51.50 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहे, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2013-2017) मध्येही धवनची कामगिरी चांगली होती. त्याने 77.88 च्या सरासरीने तीन शतकांच्या मदतीने 701 धावा केल्या आहेत.