मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड चांगलीच चुरशीची ठरणार, असं चित्र निर्माण झालं आहे.


 
रवी शास्त्री यांनी अगदी अलिकडच्या काळात अठरा महिने भारतीय संघाच्या टीम डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली होती. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांच्या कराराची मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी एक जाहिरात देऊन, इच्छुक उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली.

 
विशेष म्हणजे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यापाठोपाठ निवड समिती सदस्य विक्रम राठोड, प्रवीण अमरे, लालचंद राजपूत आणि ऋषीकेष कानिटकर अशी बडी नावं या पदाच्या शर्यतीत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या तरी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि संदीप पाटील या दोन बडया नावांमध्ये शर्यत निर्माण झाली आहे.

 


टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी संदीप पाटील उत्सुक


 

 

पाटील यांच्या निवड समिती अध्यक्षपदाची चार वर्षांची टर्म आता अखेरच्या टप्प्यात आहे. आपण अचानक मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत का दाखल झालात असा प्रश्न विचारला असता “खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझी खरी करियर ही प्रशिक्षक म्हणूनच उभी राहिली आहे. मी गेली २० वर्ष प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे” असं संदीप पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं.

 


बीसीसीआयकडून अर्जांची मागणी


 

 

दरम्यान, बीसीसीआयनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून, हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. मात्र सदर उमेदवाराला हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य नसेल, असंही बीसीसीआयनं नमूद केलं आहे.

 

 

बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवताना नऊ मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी सहाव्या मुद्यात म्हटलं आहे की, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवाराला आंतरराष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव असणं, त्याचं संभाषणकौशल्य उत्तम असणं अनिवार्य आहे. त्याचं इंग्रजीवर प्रभुत्व असावं.

 

 

आपल्याला काय म्हणायचंय ते परिणामकारकरित्या खेळाडूंपर्यंत त्याच्याकडून अपेक्षित आहे. हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल. मात्र हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य नसेल.