मुंबई : भाजप खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर 2011 रोजी क्रिकेट विश्व चषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा नायक होता. खरं तर 2011मध्ये विश्व चषकातील भारताचा विजय हा क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्षण होता. 28 वर्षांनी भारत दुसऱ्यांदा विश्व चषक जिंकला होता. तसेच महेंद्र सिंह धोनी कर्णधार असताना 2007मध्ये भारताने टी-20 विश्वचषकही जिंकला होता. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांमधील दुसरा विश्वचषकही भारतालाच मिळावा अशी सर्वांची इच्छा होती.


टी-20 आणि 50 षट्कांच्या टुर्नामेंटमध्ये एकच समान गोष्ट होती ती म्हणजे, दोन्ही टूर्नामेंटमध्ये गौतम गंभीर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आधीचे सर्व फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर संघाची धुरा गौतमच्या खांद्यावर होती आणि त्याने ती यशस्वीपणे सांभाळली देखील. पण त्या सामन्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एकाच गोष्टीची खंतं होती ती म्हणजे, गौतम आपलं शतक पूर्ण करू शकला नाही. गौतमने त्या सामन्यात 97 धावा केल्या. याबाबत आता गौतम गंभीरने एक मोठा खुलासा केला आहे. गौतमने आपलं शतक पूर्ण न होण्यासाठी कॅप्टन कूल धोनी जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

गंभीरने लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मला आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की, जेव्हा तुम्ही 97 धावांवर बाद झालात त्यावेळी नक्की काय झालं होतं? मला प्रत्येक तरूणाला आणि व्यक्तीला हे सांगायचं आहे की, 97 धावांवर पोहोचण्याआधी मी कधीच आपल्या व्यक्तिगत धावांबाबत विचार केला नव्हता.' तसेच त्याने सांगितले की, माझं लक्ष श्रीलंकेने भारतीय संघासमोर ठेवलेल्या धावांच्या लक्ष्यावर होतं. मला आजही आठवत आहे की, जेव्हा षट्क पूर्ण झाल्यानंतर मी आणि धोनी खेळपट्टीवर होतो. त्यांनी मला सांगितलं की, फक्त तीन धावा बाकी आहेत, तीन धावा कर आणि शतक पूर्ण कर.'

गंभीरच्या सांगितल्यानुसार, 'धोनीने आठवण करून दिल्यानंतर मी गडबडून गेलो आणि तिच संधी साधत परेराने मला बाद केलं. गंभीरने बोलताना सांगितले की, जर मी माझ्या लक्ष्याचाच विचार केला असता तर कदाचित आज माझं शतक पूर्ण झालं असतं.'

दरम्यान, गौतम गंभीरने श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. धोनीसोबत 109 धावांची भागीदारी केल्यानंतर थिसारा परेराने सामन्याच्या 42व्या षट्कात 97 धावांवर बाद केलं होतं.