Indian Team Semi Final Scenario Womens T20 World Cup 2024 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार आता सुरु झाला आहे. भारतीय महिला संघाने 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात केली. मात्र, या सामन्यात टीम इंडियाला 58 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत का? उपांत्य फेरीपूर्वी भारताला आपली मोहीम संपवावी लागेल का? जाणून घेऊया समीकरण....
सेमीफायनल खेळण्यासाठी जिंकावे लागणार इतके सामने?
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे. भारतीय संघाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी जवळपास सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. आता एक पराभवही भारताला महागात पडू शकतो. जर भारतीय संघ एकही सामना हरला तर त्याच्यासाठी अडचणी वाढू शकतात, कारण महिला वर्ल्ड कप 2024 मध्ये 10 संघ सहभागी झाले आहेत. आणि त्यांच्यामध्ये दोन गट आहेत. गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
टीम इंडियाला अजूनही आपल्या गटात पाकिस्तान, श्रीलंका आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. आता भारताला हे तिन्ही सामने जिंकावे लागतील आणि त्यानंतरच त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळेल. यापैकी कोणत्याही एका सामन्यात भारताचा पराभव झाला तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होतील.
भारताचा पुढील सामना पाकिस्तानशी
भारताचा पुढील सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडियाला आधी हा सामना जिंकावा लागेल. पाकिस्तान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि त्यामुळे त्यांना हलक्यात घेता येणार नाही. टीम इंडियाला आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर खूप लक्ष द्यावे लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना अनेक चुका झाल्या होत्या.
दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारताचा 58 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 4 गडी गमावून 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 19 षटकांत 102 धावांवर ऑलआऊट झाला. स्मृती मानधना, शेफाली वर्मा, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स सारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. त्यामुळे संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
हे ही वाचा -