Ruturaj Gaikwad: भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy 2021-22) अनोखी कामगिरी करून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलंय. महाराष्ट्र संघांचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराजनं पाच सामन्यात चार शतकं ठोकली आहेत. या स्पर्धेत त्यानं मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेशविरुद्ध सलग तीन शतक झळकावली. त्यानंतर पाचव्या सामन्यात चंदीगडविरुद्ध चौथे शतक लगावलंय. या कामगिरीमुळं सोशल मीडियावर ऋतुराज गायकवाडवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.


विजय हजारे स्पर्धेत ऋतुराज पहिल्यांदाच महाराष्ट्राचं नेतृत्व करीत आहे. ऋतुराजचं विजय हजारे स्पर्धेतील पाच सामन्यात चार शतक ठोकली आहेत. पाच सामन्यांत चौथे शतक झळकावून त्यानं हंगामातील त्याच्या वैयक्तिक 500 धावा पूर्ण केल्या. विजय हजारे ट्रॉफीच्या एका हंगामात चार शतक झळकावणारा ऋतुराज चौथा खेळाडू ठरलाय. यापूर्वी त्यानं केरळविरूध्द 124, मध्यप्रदेशविरूद्ध 136 आणि छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात नाबाद 154 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आज चंदीगडविरुद्ध त्यानं मोठी धाव संख्या उभारलीय. त्याच्या अगोदर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिकल आणि पृथ्वी शॉ यांनी हा कारनामा केलाय. या कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.


भारताचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2021मध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळताना त्यानं सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या विजयात ऋतुराजची महत्वाची भूमिका होती. त्यानं फाफ डुप्लेसिस सोबत चेन्नईला चौथे विजेतेपद मिळून देण्यात मोठा हातभार लावलाय. यामुळंच चेन्नईच्या संघानं ऋतुराजला पुढील हंगामासाठी रिटेन देखील केलंय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha