T20 World Cup 2024 Ind vs SA Final: भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक (T20 World Cup 2024) पटकावण्याच्या मार्गावर आहे. बार्बाडोस येथे खेळल्या जाणाऱ्या 2024 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. काही महिन्यांपूर्वी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 6 विकेट्ने पराभव पत्करावा लागल्याने निराशेचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडिया पुन्हा फायनलमध्ये पोहोचली आहे.
दक्षिण अफ्रिका आणि भारताच्या या अंतिम लढतीआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मला वाटते की जेतेपदासाठी भारत यासाठी पात्र आहे आणि भारताचे खूप अभिनंदन. गेली दोन विश्वचषक त्यांनी जिंकायला हवे होते आणि यंदाचं टी-20 विश्वचषक देखील जिंकायला हवा, असे मी खूप दिवसांपासून म्हणत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. मात्र भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकाही विचार करतील की या फिरकीपटूंविरुद्ध कोण धावा काढणार? भारताने हा सामना जिंकलाच पाहिजे, असं शोएब अख्तर म्हणाला.
विराटने तिसऱ्या क्रमांकावर यायला हवे-
अंतिम सामन्यापूर्वी शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारत-दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक सामन्याची चर्चा करत होता. यादरम्यान तो म्हणाला, 'मला ऋषभ पंत आणि रोहित शर्माने सलामीला यावं आणि विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवावं, असा सल्लाही शोएब अख्तरने भारताला दिला आहे.
टी-20 विश्वचषकात कोणत्या संघाचा वरचष्मा आहे?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ 26 वेळा T20 फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 14 वेळा पराभूत केले आहे, तर 11 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोनवेळा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे, परंतु अंतिम फेरीत काय होते हे पाहणे मनोरंजक असेल.
रोहित-विराट, जडेजाला पुन्हा संधी नाही?-
भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 'टी-20' विश्वचषकाचा अंतिम सामना खेळून या प्रकाराला अलविदा करू शकतात. काही महिन्यांआधी फायनल गमावताच दोघांच्या डोळ्यांत दुःखाचे अश्रू तरळले होते. आज डोळ्यांत अश्रू यायला हवेतः पण ते आनंदाचे! रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने फायनल जिंकून विश्वचषक दिमाखात उंचवावा, अशी प्रत्येक चाहत्याची मनोमन इच्छा आहे. बीसीसीआय आणि निवडकर्ते फायनलनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना या प्रकारात संधी देणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.