IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे पार पडला. भारतानं 8 गडी राखून विजयही मिळवला. पण या सामन्याच्या नाणेफेकीवेळी असं काही घडलं जे आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदाच घडलं होतं. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीदरम्यान एक मजेदार घटना घडली. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टॉसनंतर रोहित शर्मा 20 सेकंद विचार करत राहिला की त्याला काय निर्णय घ्यायचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधाराने आपला निर्णय देण्यासाठी इतका अवधी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. सहसा असे दिसून येते की नाणेफेकीचे नाणे जमिनीवर पडताच कर्णधार लगेच आपला निर्णय सांगतो. मात्र सामन्यात नाणेफेकीनंतर रोहित शर्मा विचारात पडला होता.


रोहित शर्मा काय विसरला?


खरंतर नाणेफेक जिंकल्यावर कोणता निर्णय घ्यायचा हे कर्णधार आणि संघ व्यवस्थापन आधीच ठरवतात. कारण ते लोक आधीच खेळपट्टी पाहून परिस्थितीचा अंदाज घेतात. रायपूरमध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार आणि संघ व्यवस्थापनामध्ये टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा झाली असावी. पण रोहित शर्मा नाणेफेकीसाठी मैदानात आल्यावर नाणेफेकीनंतर निर्णय घेण्यास तो विसरला. दरम्यान, नाणेफेक घेण्यासाठी आलेले सामनाधिकारी जवागल श्रीनाथ, नाणेफेक सादर करणारे रवी शास्त्री आणि न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयाची वाट पाहत होते. पण त्याला लागलेला वेळ पाहून उपस्थित सर्व लोक हसू लागले.


पाहा VIDEO-






रोहितला विसरण्याची सवय


रोहित शर्माला विसरण्याची सवय आहे हे अनेकांना माहित आहे. याआधीही, त्याच्या बॅगेशिवाय, तो त्याच्यासोबत त्याचा पासपोर्ट घेण्यास देखील विसरला होता. त्याच्या विसरण्याची सवय त्याच्या सहकारी क्रिकेटपटूंनी अनेकदा उघड केली आहे. अशातच एकदा तो त्याची बॅग विमानतळावर विसरला. दौऱ्यावर असलेले अनेक खेळाडू या सर्वाबाबत आठवण करून देतात. कदाचित त्यामुळेच तो नाणेफेकीच्या वेळी निर्णय घेण्यास विसरला असावा. प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ देशांतर्गत हंगामात या मैदानावर सामने खेळवले जात होते. मागच्या वर्षीही रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज दरम्यान येथे सामने खेळले गेले असले तरी. मात्र आंतरराष्ट्रीय सामना रायपूरमध्ये प्रथमच आयोजित केला गेला.


सामन्याचा लेखा-जोखा 


सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतानं घेतला. कॅप्टनचा घेतलेला हा निर्णय गोलंदाजांनी अगदी योग्य असल्याचं दाखवून दिलं. पहिल्या ओव्हरपासून न्यूझीलंडचे गडी तंबूत परतत होते. शमीनं पहिलंच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. शमीने भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पांड्या आणि सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.तर सिराज, कुलदीप आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. विशेष म्हणजे भारताकडून आज गोलंदाजी केलेल्या सहाही गोलंदाजांच्या खात्यात किमान एकतरी विकेट आली. न्यूझीलंडच्या फलंदाजीचा विचार करता सर्वाधिक धावा ग्लेन फिलिप्सने (36) केल्या. तर ब्रेसवेल (22) आणि सँटनर (27) यांनीही थोड्याप्रमाणात डाव सावरला. ज्यामुळे त्यांची धावसंख्या 108 पर्यंत पोहोचली आणि भारताला 109 धावांचं लक्ष्य मिळालं. 109 धावांचं सोपं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवातच दमदार झाली. कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) अर्धशतकी भागिदारी केली.त्यानंतर शर्मानं वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केलं. त्याच्या कारकिर्दीतील हे 48 वं आंतरराष्ट्रीय अर्धशतक होतं. ज्यानंतर मात्र लगेचच 51 धावांवर रोहित बाद झाला. कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण शुभमन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता. त्याने नाबाद 40 तर ईशान किशनने नाबाद 8 धावा करत भारताचा विजय पक्का केला.


हे देखील वाचा-