Suryakumar Yadav Hardik Pandya: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारताच्या श्रीलंका (IND vs SL) दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी टी 20 संघ आणि वनडे संघ जाहीर करण्यात आला.  एकदिवसीय मालिकेचं नेतृत्त्व रोहित शर्माचं सांभाळणार आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रुपात नवा कॅप्टन मिळाला आहे.  हार्दिक पांड्याचं नाव पिछाडीवर पडून सूर्यकुमार यादवच्या नावाला निवड समितीनं कर्णधारपदासाठी पसंती दिली. 


हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं उपकर्णधारपद भूषवलं होतं. हार्दिक पांड्याचं नाव रोहित शर्माच्या टी 20 मधील निवृत्तीनंतर चर्चेत होतं. रोहित शर्मानंतर टी 20 मध्ये कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे जाईल अशी शक्यता असताना सूर्यकुमार यादवचं नाव चर्चेत आलं. त्यामुळे अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला. निवड समितीच्या या निर्णयावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने आपलं मत व्यक्त केलं आहे. हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद द्यायला हवं होतं, असं मोहम्मद कैफ म्हणाला. 


मोहम्मद कैफ काय म्हणाला?


हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. गुजरात टायटन्ससारख्या नवीन संघाचं नेतृत्व करणं ही मोठी गोष्ट आहे. आयपीएलमध्ये गुजरातला विजयापर्यंत नेण्यासाठी हार्दिकने शून्यापासून काम केलं होतं. मला वाटतं की त्याला टीम इंडियाचं कर्णधारपद मिळायला हवं होतं, असं मत मोहम्मद कैफने व्यक्त केलं आहे. गौतम गंभीर हा उत्कृष्ट प्रशिक्षक आहे, त्याला क्रिकेटबद्दल खूप माहिती आहे. सूर्यकुमार यादव हा अप्रतिम खेळाडू आहे, त्याला कर्णधार करण्यामागे गौतम गंभीरची वेगळी रणनीती असावी. पण मला हार्दिक पांड्यासाठी खूप वाईट वाटते. हार्दिकने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती, असंही मोहम्मद कैफ म्हणाला.


हार्दिक पांड्याला संधी का नाही? 


हार्दिक पांड्यानं संघ निवड जाहीर होण्यापूर्वी एकदिवसीय मालिकेतून वैयक्तिक कारणामुळं माघार घेतली होती. निवड समितीनं  2026 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघाची बांधणी करण्याचा विचार केला असावा त्यामुळं सूर्यकुमार यादवला नेतृत्त्व करण्याची संधी दिली गेली. हार्दिक पांड्याच्या दुखापतीचा मुद्दा विरोधात गेला असण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरनं केकेआचा प्रशिक्षक असताना सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद दिलं होतं. आता गंभीरचं प्रशिक्षक झाल्यानं सूर्यकुमार यादवचं नाव वरचढ होतं. हार्दिक पांड्याचा फिटनेस हा सातत्यानं पाहायला मिळत नाही. हार्दिकला सातत्यानं विश्रांती घ्यावी लागते. कर्णधारानं संघाला प्रेरणा देण्यासाठी मैदानावर असणं आवश्यक असतं त्यामुळं ही संधी हार्दिकच्या हातून निसटली आहे.  हार्दिक पांड्याकडे श्रीलंका दौऱ्यात उपकर्णधारपद देखील असणार नाही. 


टी20 मालिकेसाठी टीम इंडिया - 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज


संबंधित बातमी:


Suryakumar Yadav : सूर्यकुमारला टी 20 चं कर्णधारपद सहजपणे मिळालं नाही, वनडेतून डच्चू मिळाला, सूर्यादादा संघाबाहेर कसा गेला?