IRE Vs IND: आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. आयपीएलमध्ये पदार्पणाच्या हंगामातच गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याकडं (Hardik Pandya) भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्याचं अनेक पैजे अचूक ठरले आणि त्यानं आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला विजयानं सुरुवात केली.


भारताचा कसोटी संघ इग्लंड दौऱ्यावर असल्यामुळं हार्दिक पांड्याकडं भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. आयर्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्यानं अनेक आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेतले. ज्यामुळं रोहितनंतर हार्दिक पांड्याकडं भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा चर्चांना वेग आलाय. 


नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा हार्दिक पंड्याचा निर्णय योग्य ठरला. पावसामुळं परिस्थिती पूर्णपणे बदलली होती, त्यामुळे हा निर्णय योग्य ठरला. भुवनेश्वर कुमारनं गोलंदाजीला सुरुवात केली. त्यानंतर हार्दिकनं स्वतः गोलंदाजी केली.


दिपक हुडाला सलामीला पाठवलं
आयर्लंडविरुद्ध सामन्यात  ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन सलामीसाठी मैदानात येतील, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, ऋतुराज ऐवजी दीपक हुडा भारताकडून सलामी देण्यासाठी मैदानात आला. या सामन्यात दीपक हुडानं सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. 


हार्दिक पांड्याचं भारतीय संघासाठी मोलाचं योगदान
आयर्लंडविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाचा दबाव जाणवल्याचं दिसलं नाही. त्यानं गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान दिलं. त्यानं गोलंदाजीदरम्यान 2 षटकात 26 धावा देऊन एक विकेट घेतली. फलंदाजीदरम्यान हार्दिकनं केवळ 12 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 24 धावा केल्या.


उमरान मलिककडून एक षटक
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या वेगात सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उमरान मलिकला येथे पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण तो फक्त एकच षटक टाकू शकला, तोही त्याला मध्यभागी देण्यात आला. उमरान मलिकनं त्याच्या एका षटकात 14 धावा दिल्या.


हे देखील वाचा-