Rohit Sharma: इंग्लड, वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायदेशात नमवून भारतीय क्रिकेट संघ आता झिम्बाब्वेमध्ये दाखल झालाय. या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ झिम्बाब्वेशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni)  खास विक्रम मोडीत काढला. भारतानं परदेशात जिंकलेल्या 102 सामन्यात रोहित शर्मानं संघाचं प्रतिनिधित्व केलंय.


रोहित भारताकडून परदेशात नोंदवलेल्या सर्वाधिक सामन्यांचा एक भाग आहे. या कामगिरीसह त्यानं महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. रोहितनं परदेशात एकूण भारतानं परदेशी भूमीवर जिंकलेल्या 102 सामन्यांमध्ये रोहितचा सहभाग आहे. या यादीत महेंद्रसिंह धोनीची दुसऱ्या स्थानावर घसरण झालीय. भारतानं जिंकलेल्या 101 सामन्यात धोनीचा सहभाग होता. कोहलीनं 97 सामन्यांमध्ये उपस्थिती नोंदवली आहे. तर, सचिन तेंडुलकर 89 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.


रोहित शर्माचं उत्कृष्ट नेतृत्व
इंग्लंड येथे खेळण्यात आलेल्या मागील टी-20 विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर रोहित शर्माच्या खांद्यावर टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जेव्हापासून रोहित शर्मानं कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतल्यापासून भारतानं आतापर्यंत एकही टी-20 मालिका गमावली नाही.


रोहितची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
रोहित शर्मानं आतापर्यंत 233 एकदिवसी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार 376 धावा केल्या आहेत. ज्यात 29 शतक आणि 45 शतकांचा समावेश आहे. तर, 45 कसोटी सामन्यात 3 हजार 137 धावा केल्या आहेत. त्यानं 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 487 धावा केल्या आहेत. ज्यात चार शतक आणि 14 अर्धशतक आहेत.


झिम्बाब्वे दौऱ्यात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती का?
आस्ट्रेलिया येत्या ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. यामुळं भारतीय क्रिकेट निवड समितीनं रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याचं निर्णय घेतलाय. नुकतीच वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेतही या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. 


ऑस्ट्रेलियातील कोणकोणत्या शहरात रंगणार टी-20 विश्वचषक
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 



हे देखील वाचा-