Team India : विश्वचषकाआधी भारतीय संघ फॉर्मात आला आहे. फलंदाज आणि गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावत आहेत. मायदेशात ऑस्ट्रेलियाला तीन सामन्याच्या मालिकेत २-० च्या फरकाने पराभव केला आहे. इंदोर येथे रविवारी झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. टीम इंडियाच्या शिलेदारांनी या सामन्यात तब्बल १८ षटकार ठोकले होते. सूर्यकुमार यादव याने लागोपाठ चार षटकार मारत कांगारुंची दाणादाण उडवली. भारतीय फलंदाजांनी षटकारांचा पाऊस पाडल्यामुळे नवा विक्रम झाला आहे. 


टीम इंडियाने इंदौर वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विक्रम केला. भारतीय फलंदाजांनी आपल्या डावात तब्बल 18 षटकार मारले गेले. यासोबत भारतीय संघ वनडे क्रिकेटच्या इतिहासात 3000 षटकार मारणारा जगातील पहिला संघ बनला. वनडेत भारताच्या नावावर सध्या 3007 षटकारांची नोंद आहे. भारतीय संघानंतर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज हा संघ आहे. त्यांच्या नावावर 2953 षटकार आहेत. तर तिसऱ्या स्थानी पाकिस्तान संघ असून त्यांच्या नावावर 2566 षटकारांची नोंद आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नावावर 2486 आणि पाचव्या स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाच्या नावावर 2387 षटकारांची नोंद आहे.


वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे संघ
भारत- 3007 
वेस्ट इंडिज- 2953
पाकिस्तान- 2566
ऑस्ट्रेलिया- 2486
न्यूझीलंड- 2387
इंग्लंड २०३२
दक्षिण आफ्रिका १९४७


भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय 


 दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99  धावांनी विजय मिळवला.  भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. पण अश्विन-जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 217 धावांत आटोपला. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट यांनी अर्धशतके ठोकली. इतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विन-जाडेजा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. या विजयासह तीन सामन्याची मालिका भारताने २-० ने जिंकली आहे. मोहाली आणि इंदौर वनडे सामन्यात भारताने बाजी मारली. अखेरचा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव संघात परतणार आहेत.


टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील सर्वोच्च धावसंख्या
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. टीम इंडियानं 5 गडी गमावून 399 धावा केल्या. नोव्हेंबर 2013 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्स गमावत 283 धावा केल्या होत्या. हा सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला.


वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या
481/6 – इंग्लंड, नॉटिंघम, 2018
438/9 – दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2006
416/5 – दक्षिण अफ्रीका, सेंच्युरियन, 2023
399/5 – भारत, इंदोर, 2023 
383/6 – भारत, बंगळुरू, 2013