IND vs WI 1st T20: वेस्ट इंडिजविरुद्ध त्रिनिदादच्या (Trinidad) ब्रायन लारा स्टेडियमवर (Brian Lara Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं (WI vs IND) 68 धावांनी विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजसमोर 191 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ 122 धावाचं करू शकला. वेस्ट इंडीजविरुद्ध विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) सकारात्मक प्रतिक्रिया देत खेळाडूंच्या प्रदर्शनाचं कौतूक केलं. वेस्ट इंडीजविरुद्ध आखलेली रणनीती यशस्वी ठरली आणि भारतानं हा सामना जिंकला, असंही रोहित शर्मानं म्हटलंय. 


रोहित शर्मा म्हणाला की, "ब्रायन लारा स्टेडियमच्या खेळपट्टीवर खेळणं थोडं खडतर होतं. सुरुवातीला या खेळपट्टीवर शॉट खेळणं सोप नव्हतं. या खेळपट्टीवर जो फलंदाज काही काळ टिकेल, त्याला इथे बराच वेळ उभं राहावं लागेल, असं समजलं. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना थोडी मदत मिळाली. पहिल्या डावात आम्ही ज्या प्रकारे 190 धावांचा टप्पा गाठला, हे खूपचं कौतुकास्पद होतं. महत्वाचं म्हणजे, या खेळपट्टीवर 170 किंवा 180 धावा करणं कठीण मानलं जातं होतं. परंतु, आम्ही आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि वेस्ट इंडीजविरुद्ध 190 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं.


रोहितकडून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव
पुढे रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही या सामन्यात वेगळ्या रनणीतीनं मैदानात उतरलो. पहिल्या 6 षटकात कशी फलंदाजी करायची, त्यानंतर मधल्या षटका काय करायचं, या गोष्टींकडं भर दिला. आम्ही तीन टप्प्यांमध्ये सुधारणा करायची होती. तसेच प्रत्येक खेळाडूकडून त्याचं सर्वोत्तम कसं मिळवू शकतो? याकडं लक्ष केंद्रीत केलं. आम्ही खेळाडूंना वेगवेगळ्या भूमिका दिल्या होत्या आणि त्यांनी आपपल्या जबाबदाऱ्या चोख बजावल्या. प्रत्येक सामन्यात यश मिळेलच असे नाही. पण प्रत्येक वेळी फलंदाजीत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा लागतो." यादरम्यान रोहित शर्मानं असंही सांगितलं की त्याच्या संघात खूप प्रतिभा आहे आणि खेळाडूंना फक्त त्यांच्या कौशल्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.वेस्ट इंडीजमध्ये भारतीय संघाला चांगला पाठिंबा मिळला", असंही रोहितनं सांगितलंय.


भारताचा वेस्ट इंडीजवर दमदार विजय
दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या  (64 धावा) तुफानी अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या( नाबाद 41 धावा) फिनिशिंग टचच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडीजसमोर 191 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर गुडघे टेकले. अखेर या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाला 68 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दमदार प्रदर्शन करणाऱ्या दिनेश कार्तिकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. 


हे देखील वाचा-