Hardik Pandya on Rishabh Pant: भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. टी-20 मालिका 3 जानेवारी, मंगळवारपासून सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनं सर्वात आधी पंतला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, पंतच्या अनुपस्थितीत टीम इंडियावर काय परिणाम होतील याबद्दल त्यानं पत्रकारांना उत्तर दिलं. 


ऋषभ पंतबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला की, "जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं. यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं आणि एक संघ म्हणून त्यानं लवकरात लवकर बरं व्हावं अशी आमची इच्छा आहे. आमच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. आम्ही तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतोय." 


ऋषभ पंतचा अपघात झाल्यामुळे त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, त्यामुळे पंत टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिका खेळू शकणार नाही. यासंदर्भात हार्दिकला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पंतच्या संघातील उपस्थितीबद्दल बोलताना तो म्हणाला की, "तो नक्कीच टीममधील खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. पण आता काय परिस्थिती आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पंत टीममध्ये असल्यानं खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे त्याची अनुपस्थिती अशी गोष्ट आहे, जी आपण नियंत्रित करू शकत नाही." याशिवाय पंतऐवजी ज्या खेळाडूला संघात संधी मिळेल, त्यानं या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असंही मत हार्दिकनं व्यक्त केलं आहे.  


श्रीलंका मालिकेत पंतचा टीममध्ये समावेश नव्हता


महत्त्वाची बाब म्हणजे, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 आणि एकदिवसीय मालिकेत पंतचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. मात्र फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिटनेसवर अधिक काम करण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीलंका मालिकेत त्याचा समावेश प्लेईंग 11 मध्ये करण्यात आला नव्हता. पण या सगळ्याआधीच त्याचा दुर्दैवी अपघात झाला. 


श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडिया 


हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, ईशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.


भारत आणि श्रीलंका टी20 मालिकेला आजपासून सुरुवात 


भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (03 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला पुणे आणि 15 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ मैदानात उतरणार आहे.