वेलिंग्टन : वेलिंग्टन कसोटीत यजमान न्यूझीलंडने भारतावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. बेसिनच्या रिवर्व मैदानावर झालेल्या सामन्यात चौथ्या दिवशी भारताचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. यानिमित्ताने न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधला हा शंभरावा विजय ठरला आहे. तर कसोटी चॅम्पियशनशिपमध्ये सात सामन्यातील भारताचा पहिला पराभव आहे.


सामन्यात एक क्षण असं वाटतं होतं भारतीय संघाला डावाने पराभव स्विकारावा लागेल अशी परिस्थिती होती. मात्र तळातल्या फलंदाजांनी चांगली खेळी करत डावाची नामुष्की टाळली. पण तरीही दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ नऊ धावांचं माफक आव्हान दिलं होतं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत सामना जिकंला.

वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या डावात भारत फक्त 191 धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या नऊ धावांचं आव्हान मिळालं होतं.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ 39 धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज संयमाने फलंदाजी करतील असा अंदाज होता, मात्र ट्रेंट बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला.

यानंतर भारताचे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. एका क्षणाला भारतावर डावाने पराभव स्विकारण्याची वेळ आलेली होती. मात्र अखेरच्या फळीत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करत भारताचा पराभव टाळला.